Chitra Wagh on Arvind Kejriwal : राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा करण्यासोबतच ही माहिती दिली. चढ्ढा यांनी स्वतःच्या नावासह भाजपमध्ये सामील होणाऱ्या इतर सात जणांची नावे सांगितली आहेत. दरम्यान, या घडामोडीवर भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक खासदार जो लोकांचे प्रश्न विचारतो म्हणून, त्यांच्या पक्षात गदारोळ झाल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, याच मुद्यावरुन चित्रा वाघ यांनी अरविंदे केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर देखईल टीका केली.
चांगले प्रश्न विचारणाऱ्या माणसांवर कारवाई झाली म्हणून लोकांना वाईट वाटलं. पण आपची जी विचारधारा आता लोकांसमोर येत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. याच्या आधी सुद्धा कुमार विश्वास सारखे लोकं याच वागण्यामुळे आप सोडून गेले होते. यांच्या पेक्षा जास्त कोणाची प्रसिद्धी होऊ नये, कोण वरचढ ठरु नये असं केजरीवाल यांना वाटत असल्याचे वाघ म्हणाल्या.
राघव चढ्ढा यांचं आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या खासदारांचे स्वागत आहे. मोदीजी विकासाच्या दृष्टीने देशाला नेत आहेत, त्यामध्ये लोकं जोडले जात आहेत. केजरीवालांनी जे आरोप आमच्यावर केले त्यात तथ्य नव्हतं. आज पुन्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्यासोबत येऊन केजरीवाल यांचा खरा चेहरा दाखवून दिल्याचे मत वाघ यांनी व्यक्त केले.
सोलापूर शहरातील अल्पवयीन मातांचे प्रकरण सध्या अत्यंत गंभीर वळणावर असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर देखील वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. हे दुर्दैवी आणि विचार करायला लावणारी गंभीर अशी गोष्ट आहे. या संदर्भात जे काही पाऊल उचलायची आहेत ते शासन नक्कीच उचलेल. बालविवाह रोखण्याचे मोठं काम याआधी झालं आहे. पण सोलापुरात प्रमाण वाढलं असेल तर यांदर्भात आणखी काय करता येईल ते करु असे चित्रा वाघ म्हणाल्या. मी या संदर्भात सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः बोलेन असे वाघ म्हणाल्या. विकृत लांडग्यांना ठेचून काढायचं काम देवाभाऊच्या सरकारच्या काळात सुरु असल्याचे वाघ म्हणाल्या. धर्मांतर असो किंवा एखादा विकृत बाबा किंवा मग एखाद्या मुलीला फूस लावून अत्याचार करणारे असो सबका हिसाब होगा और बहुत अच्छा होगा असे वाघ म्हणाल्या.