Raja Shivaji Review : शौर्य, पराक्रमाची महागाथा; ‘राजा शिवाजी’ पाहताना उफाळून येतील भावना, रितेश देशमुखची कामगिरी कशी?
admin May 01, 2026 04:25 PM
[ad_1]

Raja Shivaji Review : छत्रपती शिवाजी महाराज.. या विषयावर आणि इतिहासावर आजपर्यंत असंख्य चित्रपट बनवले गेले. परंतु महाराजांवर अत्यंत भव्यदिव्य, बिग बजेट, कलाकारांची मोठी फौज घेऊन, तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत गोष्टींचा वापर करून मोठ्या पातळीवर चित्रपट बनवण्याचं स्वप्न अभिनेता रितेश देशमुखने पाहिलं. जवळपास गेल्या दहा वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करत होता, अखेर त्याचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘राजा शिवाजी’ हा जवळपास 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला मराठीतला सर्वांत महागडा चित्रपट ठरला आहे, तर हिंदीतही तो अत्यंत भव्यतेनं प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा रितेशनेच केलं आहे. जागतिक दर्जाचे व्हीएफएक्स, उत्तम सिनेमॅटोग्राफी ही ‘राजा शिवाजी’ची जमेची बाजू ठरतेय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर साकारायचा म्हटलं की, त्यात छोटीशीही चूक अमान्य आहे. त्यातही रितेश देशमुखला अशा ऐतिहासिक भूमिकांमध्ये कधीच न पाहिल्याने तो या भूमिकेसाठी योग्य आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. अनेकदा मोठा बजेट, दमदार व्हिएफएक्स, मोठी कलाकारांची फौज असूनही दिग्दर्शन आणि अभिनयातून पडद्यावर जादू निर्माण करता आली नाही, तर इतर सर्व गोष्टी फोल ठरतात. आता रितेश देशमुखने या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर ती जादू निर्माण केली का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कथानक

या चित्रपटाच्या कथेची सुरुवात एका अशा काळापासून होते, जेव्हा सर्वत्र अन्याय पसरला होता. आपल्याच मातीतल्या लोकांच्या रक्ताने दख्खन लाल झाला होता. 1629 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे आईच्या पोटात होते, तेव्हा देवगिरी किल्ल्यावर (दौलताबाद) विश्वासाला तडा जाणारी एक घटना घडली. या घटनेनं इतिहासाची दिशाच बदलली होती. सुलतान बुरहान निजामशहाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा लखुजी राजे जाधव यांची त्यांच्या मुलांसह आणि नातवासह दरबारात निर्घृणपणे हत्या करण्यात येते. एकीकडे मुघलांचा जुलूम सुरू होता आणि दुसरीकडे निजाम, आदिलशहाकडून गावंच्या गावं उद्ध्वस्त केली जात होती. अशा कठीण परिस्थितीत जिजाऊ मातेनं त्यांच्या मुलांच्या मनात लहानपणापासूनची स्वराज्याचं स्वप्न रुजवलं आणि त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं. पुढे इतिहासातील अनेक घटना आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून होणारा अफजलखानाचा वध यात पहायला मिळतो.

रितेश देशमुखची कामगिरी

‘राजा शिवाजी’मध्ये रितेशने फक्त कॅमेरासमोरच आपली छाप पाडली नाही, तर कॅमेरामागे राहून त्याने बऱ्याच गोष्टी सांभाळल्या आहेत. बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम करताना रितेश केवळ एक अभिनेता म्हणूनच समोर येतो, परंतु मराठी चित्रपट आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय म्हटल्यावर त्याची जबाबदारी हिमालयाइतकी मोठी होऊन जाते. हा चित्रपट साकारताना रितेशवर दुहेरी दबाव होता. शिवाय कोणतीही चूक ही इतिहास आणि भावनांशी छेडछाड मानली जाऊ शकली असती. अशा तणावपूर्ण परिस्थितीतही रितेशने संयमाने आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. रितेशने त्याच्या दिग्दर्शनातून सिद्ध केलंय की तो केवळ चांगला अभिनेताच नाही, तर उत्तर दिग्दर्शकसुद्धा आहे, जो दबावाखालीही खचून जात नाही. ही त्याच्या कारकिर्दीतली सर्वांत धाडसी आणि यशस्वी झेप म्हणायला हरकत नाही.

अभिनय

पडद्यावर विविध भूमिका साकारताना अभिनेता किंवा अभिनेत्रीची ठराविक प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत जाते. रितेशबद्दलही अशीच काहीशी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात होती. मग ती विनोदी भूमिकांची प्रतिमा असो किंवा ‘एक विलेन’मध्ये साकारलेल्या क्रूर खलनायकाची प्रतिमा असो.. पण रितेशला ऐतिहासिक भूमिकेत कधीच कोणी कल्पना केली नसेल. त्यातही याआधी अनेक दमदार कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत चोख भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. रितेश हे मोठं आव्हान पेलू शकेल का, असा प्रश्नही होताच. पण अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाब, सामर्थ्य त्याने पडद्यावर जिवंत केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा होणार नाही, हे नक्की.

दुसरीकडे संजय दत्त पुन्हा एकदा खलनायक बनून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खरंतर संजूबाबा गेल्या काही वर्षांत सतत एकाच पठडीतल्या भूमिकांमध्ये झळकतोय, तरीही प्रत्येक भूमिकेत प्रेक्षक त्याला स्वीकारत आहेत. ‘राजा शिवाजी’मध्येही त्याने समाधानकारक कामगिरी केली आहे. तर अभिषेक बच्चननेही त्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. यामध्ये तो मराठी संवाद बोलतानाही दिसतो. विद्या बालन यात विशेष भाव खाऊन जाते. अभिनय आणि कौशल्यपूर्ण संवादफेकीने ती सर्वांचं लक्ष वेधून घेते.

अभिनेत्री भाग्यश्रीचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला असला तरी मराठी भाषेवर तिची पकड तितकी मजबूत नाही. त्यामुळे काही ठिकाणी तिचे सीन्स प्रेक्षकांवर तिचा प्रभाव पाडत नाहीत. सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांसारख्या कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने हा चित्रपट आणखी भक्कम बनला आहे. जिनिलिया देशमुख आणि बोमन इराणी यांच्या भूमिका तुलनेनं लहान पण प्रभावी आहेत. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये सलमान खान हा जिवा महालाच्या भूमिकेत समोर येतो. त्याच्या एण्ट्रीलाच थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो.

संगीत आणि तांत्रिक बाबी

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या ऐतिहासिक कथानकाच्या चित्रपटात प्रेक्षकांना जाणवलेली सर्वांत मोठी उणीव म्हणजे त्याचं संगीत. तर रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’मध्ये अजय-अतुल या जोडगोळीने दिलेलं संगीत याचा भक्कम कणा बनला आहे. ‘जय शिवराय’सारख्या गाण्यांवर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. मनाला भिडणारं पार्श्वसंगीत या चित्रपटातील प्रत्येक भावना, युद्धाच्या प्रत्येक दृश्याचा प्रभाव दहा पटींनी वाढवतं. तर संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी म्हणजे प्रेक्षकांसाठी एक नेत्रसुखद अनुभव आहे.

पहावा की पाहू नये?

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची लांबी थोडी अधिक वाटू शकते, कारण उत्तरार्धातलं एडिटिंग अधिक कुशल पद्धतीने करता आलं असतं. पण चित्रपटाची भव्यता आणि इतर गोष्टी पाहता या लहानशा उणीवेकडे दुर्लक्ष करता येऊ शकतं. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट तुम्हाला फक्त प्रेरणाच देत नाही, तर आपल्या गौरवशाली इतिहासाशी पुन्हा जोडण्याची सुवर्णसंधी देतो.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.