Mumbai Pune Expressway : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर टोल माफ; वाहतूक कोंडीमुळं सरकारचा मोठा निर्णय
Saam TV May 01, 2026 06:45 PM

Eknath Shinde On Mumbai Pune Expressway traffic : लाँग वीकेंडमुळे नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, पुणे-सातारा आणि मुंबई-नाशिक या महामार्गांवर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला बसला असून, तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकीकडे 'मिसिंग लिंक'चे लोकार्पण होत असतानाच, दुसरीकडे नागरिकांना मात्र तासनतास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

टोल वसुली थांबवण्याचे निर्देश

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल वसूल करू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आज 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, वाहतूककोंडीत अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी टोल घेऊ नका. उन्हाच्या तडाख्यात तीन ते चार तास कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! इतक्या महिला ठरल्या पात्र, पण यांचा ₹१५०० चा लाभ कायमचा बंद

लोणावळा घाटात वाहनांच्या रांगा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळा घाटात आज सकाळपासूनच मोठी कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यादेखील या कोंडीत ३ ते ४ तास अडकल्या होत्या. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून महामार्गावरील भीषण परिस्थिती मांडली. कोंडीची तीव्रता इतकी आहे की, कडाक्याच्या उन्हामुळे महामार्गावर १० ते १२ गाड्या एकापाठोपाठ एक बंद पडल्या आहेत. यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, खासदार सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत

मुंबई-गोवा महामार्गाचीही दुरवस्था

कोलाड, इंदापूर आणि माणगाव परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मे महिना आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणाकडे निघाले आहेत. या गर्दीमुळे पर्यटकांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबई-पुण्याला जोडणारी 'मिसिंग लिंक' आज खुली होत असली, तरी गेली १४ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, ३८०० रूपयांनी झालं स्वस्त, वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.