पालघर : जिल्हा परिषद प्रशासनाच्या एका धक्कादायक निर्णयाने जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल 57 शाळांमधील (Palghar ZP School) नववी आणि दहावीचे वर्ग पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निधीचे कारण देत हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुमारे 6,500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयाविरोधात पालक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शिल्लक निधी वापरता येत नसल्याचे कारण देत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. नववी-दहावीचे वर्ग बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना इतर शाळांचा पर्याय शोधावा लागणार असून अनेकांसाठी हे आर्थिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या कठीण ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे. नववी-दहावी हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे वर्ष आहेत. वर्ग बंद झाल्यामुळे अभ्यास बिघडेल आणि पुढे काय करायचं हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया मुलांनी दिली.
तर पालकांनीही प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या ठिकाणी शाळा मिळणं कठीण आहे. प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून नववी आणि दहावीचे वर्ग बंद करण्याच्या या निर्णयामुळे संबंधित शाळांमधील शिक्षकांच्या नोकऱ्यांवरही गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निर्णयाविरोधात राजकीय आणि सामाजिक स्तरावरही विरोध वाढताना दिसत आहे. अनेकांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हणत तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत कोणता तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा: