आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची स्थिती करो या मरोची आहे. एखाद दुसरा पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघाची स्थिती नाजूक स्थिती आहे. इतकंच काय तर त्याचा प्रभावही या सामन्यात पडलेला नाही. त्याने या स्पर्धेतील सात सामन्यात 128 धावा केल्या आणि फक्त 4 विकेट काढल्या. या संपूर्ण स्पर्धेत त्याचं वलय काही दिसलं नाही. मोठी फटकेबाजी करण्यात तरबेज असलेल्या हार्दिक पांड्याच्या बॅटमधून काही धावा निघत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सची पूर्ण घडी विस्कटली आहे. या दरम्यान टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर अश्विनने आपलं मत मांडलं आहे. हार्दिक पांड्याच्या खेळीचं त्याने निरीक्षण करत काय चुकतं ते सांगितलं आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या फ्लॉप का होतोय याचं कारण काय ते कळू शकते.
आर अश्विनच्या मते, हार्दिक पांड्याची बॅट या पर्वात त्याच्या फलंदाजीत मोठा अडसर ठरत आहे. यासाठी त्याने काही सूचना दिल्या आहेत. आर अश्विनने युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘मी हार्दिक पांड्यासोबत खेळलो आहे. त्याची एक बॅट माझ्याजवळ आहे. हार्दिक पांड्या खूपच वजनदार बॅटसोबत खेळतो. वाढत्या वयासोबत हाताची ताकद कमी होते. मला वाटतं की, हार्दिक हार्ड लेंथ चेंडूचा सामना करताना लेट होत आहे. कारण तो वजनदार बॅटचा वापर करत आहे.’
आर अश्विनने त्याला बॅटचं वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. आर अश्विन पुढे म्हणाला की, ‘त्याची बॅट स्विंग खूप खास आहे. पण मी मागच्या तीन चार सामन्यापासून पाहात आहे की त्याची बॅट खूपच लेट येत आहे. शशांक सिंहविरुद्धही हार्ड लेंथ चेंडूवर प्रहार करताना त्याची बॅट लेट आली. हे खूपच आश्चर्यकारक आहे. मी चुकीचा असू शकतो, पण यावर विचार करायला काहीच हरकत नाही.’ आर अश्विनच्या मते हार्दिक पांड्याने कमी वजनाची बॅट वापरली तर हार्ड लेंथ चेंडूवर चांगल्या प्रकारे टायमिंग करू शकतो. तसेच त्याच्या फलंदाजीत सुधारणा होऊ शकते.