आगामी महिला टी-20 विश्वचषक आणि त्यापूर्वी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2 मे रोजी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात काही धक्कादायक बदल आणि काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
डब्ल्यूपीएल (WPL) 2026 मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना थक्क करणाऱ्या नंदिनी शर्माला (Nandini Sharma) पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना तिने या हंगामात तब्बल 17 विकेट्स घेतल्या. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय वेगवान गोलंदाजीला आता अधिक धार मिळणार आहे.
यष्टीरक्षक यास्तिका भाटिया आणि अष्टपैलू राधा यादव यांनी संघात पुनरागमन केले असून, त्यांच्यामुळे संघाचा समतोल अधिक मजबूत झाला आहे. तसेच अनुष्का शर्मा आणि उमा छेत्री यांना संघात स्थान मिळवता आले नाही. तर, वेगवान गोलंदाज काशवी गौतम गुडघ्याच्या दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हती.
अनुभवी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून उतरण्याची तिची ही पाचवी वेळ असेल. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ती भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती, त्यामुळे तिचा फॉर्म भारतासाठी जमेची बाजू आहे.
निवडलेला भारतीय संघ (Squad):
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), श्री चरानी, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नंदिनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.