11th Online Admission : १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणीची मुदत वाढवली
Saam TV May 03, 2026 02:45 PM
  • अकरावी प्रवेशासाठी नोंदणीची मुदत वाढवली

  • दहावी निकालापूर्वी ‘भाग एक’ भरता येणार

  • सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली

  • प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि मेरिटनुसार होणार

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने नोंदणीची मुदत वाढवली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल लागेपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल (10th Board Exam Result ) लागेपर्यंत अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे.

यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी १० एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन संचालनालयाने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Election : पश्चिम बंगालमध्ये २८५ मतदान केंद्रांवर होणार फेरमतदान, असे असेल वेळापत्रक

आतापर्यंत सहा लाख ९७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून हा प्रतिसाद मोठा मानला जात आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा ‘भाग एक’ भरायचा असून त्यामध्ये वैयक्तिक माहिती देणे आवश्यक आहे. यात आधार क्रमांक, शाळेचा तपशील, जन्मतारीख आदी माहितीचा समावेश असतो. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची निवड आणि प्राधान्यक्रम देण्याची संधी मिळणार आहे.

Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

अर्जाचा ‘भाग दोन’ मात्र दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच सुरू होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची निवड करता येईल. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार पार पडणार असून कोणत्याही प्रकारचा ऑफलाइन प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. इतर मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थांशी थेट संपर्क साधावा लागणार आहे. मात्र, इतर मंडळांतून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर राज्य मंडळाच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छित असतील, तर त्यांनाही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रिया शेवटच्या पात्र विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून पुढील टप्प्यांसाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.