टीव्ही इंडस्ट्रीत काम करून ओळख मिळवलेली अन्ना जयसिंघानी हिने अभिनय क्षेत्राला अलविदा करत पूर्णपणे अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. तिने आपलं आयुष्य भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत समर्पित केलं असून आता ती वृंदावन येथे वास्तव्यास आहे.
अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर अन्नाने आपलं नाव बदलून अन्ना परी हरिवंशी असं ठेवलं आहे. तिने या बदलाबाबत आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल माहिती स्वतःच्या यूट्यूब चॅनल ‘मेरो वृंदावन’ वर दिली आहे.
ग्लॅमर दुनियेतून अध्यात्माकडे
ग्वाल्हेर येथील अन्नाला लहानपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड होती. याच स्वप्नांसाठी ती मुंबईत आली. 2011 साली तिने फ्रीलान्स कोरिओग्राफर म्हणून करिअरची सुरुवात केली. या काळात तिला सलमान खान आणि कोरिओग्राफर थॉमस पॉलसन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
पुढे अभिनयाची आवड वाढल्यामुळे तिने Balaji Telefilms मध्ये अभिनयाचा कोर्स केला. त्यानंतर Crime Patrol आणि Savdhaan India सारख्या शोमध्ये ती झळकली. तसेच देखा एक ख्वाब या मालिकेत चक्की या भूमिकेमुळे तिला चांगली लोकप्रियता मिळाली.
ISKCON मुळे बदलले आयुष्य
मुंबईत असताना तिच्या काही मित्रांमुळे ती ISKCON शी जोडली गेली. हळूहळू तिने त्यांची जीवनशैली स्वीकारली. तिने कांदा-लसूण, मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे सोडलं. तिने सांगितले की, श्रीकृष्णभक्तीमुळे तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला आणि ती वृंदावनात जाण्याची इच्छा व्यक्त करू लागली.
अन्नाने सांगितलं की, तिला एकदा स्वप्नात प्रेमानंद जी महाराज यांचे दर्शन झाले आणि त्यांनी तिला नामस्मरण करण्यास सांगितले. या अनुभवाचा तिच्यावर खोल परिणाम झाला. यानंतर ती वृंदावनात गेली, महाराजांकडून दीक्षा घेतली आणि पूर्णवेळ कृष्णभक्त म्हणून जीवन जगण्याचा निर्णय घेतला.
अन्नाच्या मते, ग्लॅमरच्या जगात मिळणारी प्रसिद्धी तात्पुरती असते, पण अध्यात्मात मिळणारी शांती कायमची असते. श्री नामाचा जप केल्याशिवाय जीवन अपूर्ण आहे असं ती म्हणली. एकेकाळी अभिनय क्षेत्रात नाव कमावणारी अन्ना जयसिंघानी आज पूर्णपणे अध्यात्मात रमली आहे. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जीवनात शांती शोधण्यासाठी वेगळा मार्ग स्वीकारण्याचं उदाहरण ठरत आहे.