पाणीपुरवठा बंद
esakal May 06, 2026 08:45 PM

एमआयडीसीकडून २४ तास पाणीपुरवठा बंद; ठाणे, नवी मुंबईसह औद्योगिक पट्ट्यांना फटका

तुर्भे, ता. ६ (बातमीदार) ः वाढती पाणीटंचाई आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (MIDC)ने ७ व ८ मे दरम्यान २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रांसह टीटीसी आणि वागळे इस्टेट औद्योगिक पट्ट्यांना मोठा फटका बसणार आहे.
एमआयडीसीकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, गुरुवारी (ता. ७) दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवार (ता. ८) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशयावर बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक एक, दोन आणि तीनवर उन्नतीकरण तसेच तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने हा शटडाऊन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, आंध्रा आणि बारवी धरणांतील सध्याची पाण्याची तूट आणि येत्या हंगामात अपेक्षित कमी पाऊस यामुळे ३१ ऑगस्ट २०२६पर्यंत पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी कपातीचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातही पाणीपुरवठ्यावर निर्बंध राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या शटडाऊनचा थेट परिणाम ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील नागरिकांवर होणार असून टीटीसी आणि वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनाही पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे, की पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही तास कमी दाबाने पाणी येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आणि उद्योगांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, तसेच या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, महापालिका प्रशासनावर पर्यायी उपाययोजना करण्याचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.