निदा खान: नाशिकमधील बहुचर्चित ‘TCS’ कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिच्याकडेच धर्मांतर घडवून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. निदा खान सध्या फरार असून पोलीस तिचा राज्यभर शोध घेत आहेत.
मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये निदा खान ही ‘वॉन्टेड’ आरोपी आहे. टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. धार्मिक भावना दुखावणे, गुंगीकारक औषधे देऊन अत्याचार करणे आणि पीडितांना धमकावणे अशा गंभीर आरोपांची टांगती तलवार निदावर आहे. एसआयटीला (SIT) मिळालेल्या पुराव्यांनुसार, निदा केवळ या कटात सहभागी नव्हती, तर तिला विशिष्ट टार्गेट देण्यात आले होते.
निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्राप्त झालेले पुरावे लक्षात घेता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन फेटाळल्यापासून निदा खान फरार असून, नाशिक पोलिसांची विशेष पथके राज्यभर तिचा शोध घेत आहेत.
2 एप्रिल रोजी एका पुरुष कर्मचाऱ्याने मुंबई नाका पोलिसात फिर्याद दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तपासादरम्यान तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, निदा खान हिच्या अटकेनंतर या प्रकरणात आंतरराष्ट्रीय धागेदोरे किंवा मोठ्या रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) कंबर कसली असून, त्याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खरात याच्याविरोधात दाखल असलेल्या 9 गुन्ह्यांचे दोषारोपपत्र (Charge Sheet) पुढील आठवड्यात न्यायालयात सादर केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरात याच्यावर महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. त्याच्या अटकेनंतर 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न ‘एसआयटी’ करत आहे. यामध्ये महिला अत्याचाराची 8 प्रकरणे आणि फसवणुकीचे 1 अशा एकूण 9 प्रकरणांचा तपास समावेश आहे. आतापर्यंत करण्यात आलेला तापस, गोळा करण्यात आलेले पुरावे आणि नोंदविण्यात आलेल्या जबाबांच्या आधारावर दोषारोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा