PM Modi on Gold : भारतातील लोकांकडे किती सोनं? मोदींनी खरेदी न करण्याचं का केलं आवाहन?
Tv9 Marathi May 11, 2026 04:45 PM

PM Modi on Gold : अमेरिका-इराण युद्धामुळे जगात तेल संकटाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दरम्यान वाढता तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काही आवाहनं केली आहेत. गोष्टी जबाबदारीने वापरण्यास मोदी यांनी जनतेला सांगितलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान मोदींनी लोकांना पुढील वर्षभर अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी अनावश्यक खर्च कमी करण्याचा आणि गरज भासल्यास घरून काम करण्याचा सल्लाही दिला आहे. परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करण्यासाठी आणि आयातीवरील खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सर्व भारतीयांना हा संदेश दिला आहे.

भारत सोन्याचा सर्वात मोठा उपभोक्ता

भारत जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या उपभोक्त्यांपैकी एक आहे. भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याला केवळ एक दागिना न मानता, एक गुंतवणूक आणि सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. लग्न, सण आणि पारंपरिक प्रसंगांसाठी सोनं खरेदी करणं हे आपल्या देशाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. यामुळेच भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो.

जवळपास 34,600 टन सोनं

मार्गन स्टॅनल आणि वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या रिपोर्टनुसार, भारतातील लोकांकडे जवळपास 34,600 टन सोनं आहे. हा आकडा जगातील सर्व मध्यवर्ती बँकांच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यापेक्षा देखील जास्त आहे. तो जगाच्या एकूण सुवर्णसाठ्याच्या अंदाजे 11% ते 13% आहे. ग्रामीण भागातही, मोठ्या संख्येने कुटुंब सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात.

भारतीयांकडे असलेल्या सोन्याची किंमत

गेल्या एक वर्षत सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे… ज्यामुळे भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याचं एकूण मूल्य जवळपास 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे. भारतीय चलनात, त्याचं मूल्य 450 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, ही एकूण कौटुंबिक सोन्याची संपत्ती आता भारताच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे, जी अंदाजे 4.1 ट्रिलियन डॉलर्स आहे. अशात, सोने आणि चांदीच्या वाढत्या किमती पाहता, गुंतवणूकदार अधिकाधिक गोल्ड ईटीएफकडे वळत आहेत.

सांगायचं झालं तर, भारत अधिकांश सोनं विदेशातून आयात करतो. अशात जागतीक तणाव वाढतो आणि कच्च्या तेलाचे दर वाढतात. एवढंच नाही तर, सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर अतिरिक्त दबाव येतो. सरकारने अशीही चिंता व्यक्त केली आहे की, जर लोकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी सुरू ठेवली, तर फार मोठं नुकसान होऊ शकतं. याच कारणामुळे पंतप्रधान मोदींनी जनतेला राष्ट्रीय हितासाठी अनावश्यक खरेदी न करण्याचे आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी नागरिकांना ऊर्जा संवर्धन आणि जबाबदार वापरासाठी उपाययोजना करण्याचं आवाहनह देखील केले आहे.

वर्क फ्रॉम होम करण्यासाठी आवाहन

मोदी यांनी कंपन्यांना देखील एक आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यास सांगितलं आहे.कोरोना काळात अनेक घरात बसून काम केलं. ऑनलाइन मीटिंग आणि व्हर्चुअल कॉन्फ्रेंसला अधिक महत्त्व दिलं. त्यांचं असं म्हणणं आहे की, यामुळे इंधनाची बचत होईल आणि आर्थिक दबाव देखील कमी होईल… सांगायचं झालं तर, परिस्थिती अशीच राहिली तर, सरकार आणखी निर्णय घेऊ शकेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.