Abhishek Bachchan Riteish Deshmukh Raja Shivaji: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या मराठी सिनेमामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवसांहून अधिक काळ लोटला आहे आणि प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन रितेश देशमुखनं (Directed by Ritesh Deshmukh) केलं असून, त्यानंच या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) यांची मुख्य भूमिकाही साकारली आहे. सलमान खान (Salman Khan), विद्या बालन (Vidya Balan) आणि अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या सिनेमात कोणतंही मानधन न घेता काम केलं आहे. याच पार्श्वभूमीवर, सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन यानं या वृत्तांबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं असून, माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांना त्यानं पूर्णविराम दिला आहे.
गेल्या काही काळापासून ज्या प्रश्नाची बरीच चर्चा सुरू होती, त्याबाबत अभिषेक बच्चननं अखेर आपले मौन सोडलं आहे. कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या अभिषेकसारख्या अभिनेत्यानं 'राजा शिवाजी' या सिनेमात कोणतंही मानधन न घेता काम करण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नावर अभिनेत्यानं दिलेलं उत्तर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. अभिषेक बच्चन यानं स्पष्ट केलं की, रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांच्या या 'ड्रीम प्रोजेक्ट'मध्ये त्याला केवळ एक सिनेमा दिसला नाही, तर त्यामागील भावना आणि आदर यांचा तो एक आविष्कार वाटला. नेमक्या याच कारणामुळे त्यानं या प्रोजेक्टसाठी आपला बिनशर्त होकार दिला.
News18 ला अभिषेक बच्चन यानं नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, जेव्हा एखाद्या कलाकाराला एखाद्या कथेवर किंवा दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनावर विश्वास असतो, तेव्हा मानधन ही गोष्ट दुय्यम ठरते... आजच्या काळात लोक सोशल मीडिया रिल्स आणि बातम्यांमधून कलाकार किती मानधन घेतात किंवा किती व्हॅनिटी व्हॅन मागतात, यावर चर्चा करतात... पण शेवटी सिनेमा हा एक कलाप्रकार आहे... जर आमचा एखाद्या गोष्टीवर विश्वास असेल, तर आम्हाला मानधन न घेण्यात कोणतीही अडचण नसते. हा केवळ पैशांचा व्यवहार नसून एक भावनिक गुंतवणूक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीनं खऱ्या अर्थानं प्रेरित होता, तेव्हाच खऱ्या कलेचा जन्म होतो..."
अभिषेक बच्चन यानं असंही नमूद केलंय की, काम करत असताना कलाकारांना प्रेरणा मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचं कौतुक करताना तो म्हणाला, "आजकाल चित्रपट निर्मितीमध्ये अनेक गोष्टींचा हिशोब केला जातो; मात्र, सर्व काही केवळ आकडेवारीवरच अवलंबून नसतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र होता. त्यांनी याकडे कधीच केवळ एक 'प्रोजेक्ट' म्हणून पाहिलं नाही, तर त्याऐवजी ही काहीतरी अधिकच महान आणि पवित्र गोष्ट आहे, या दृढ विश्वासानं त्यांनी त्यावर काम केलंय..."
सिनेमाची भव्यता आणि त्यातील आव्हानांवर चर्चा करताना अभिषेक बच्चन यांनी नमूद केलंय की, मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वी इतक्या भव्य प्रमाणावर कोणताही सिनेमा निर्माण झाला नव्हता. तो म्हणाला की, "चित्रपटाच्या संपूर्ण टीमला (युनिटला) आनंदी, सुरक्षित आणि उत्साही ठेवणं हे एक अत्यंत कठीण काम होतं, परंतु रितेश आणि जिनिलिया यांनी ते अत्यंत सुरेखपणे हाताळलंय. मला कोणाकडूनही एकही तक्रार ऐकायला मिळाली नाही."
'राजा शिवाजी' सिनेमाद्वारे अभिषेक बच्चन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तो म्हणाला, "मुंबईतच लहानाचा मोठा झाल्यामुळे मला मराठी भाषेची नक्कीच ओळख होती. पण पडद्यावर पहिल्यांदाच मराठी बोलताना मला थोडी धाकधूक वाटत होती." तरीही, रितेशच्या उपस्थितीमुळे त्याला मोठा दिलासा मिळाला आणि रितेश सर्व गोष्टींची काळजी घेईल, याबद्दल त्याला पूर्ण खात्री होती, असंही तो म्हणाला.