पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये मंगळवारी भरदिवसा एका आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेतील शिरगाव परिसरात ही थरारक घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्माराम पाटील असे मृत कार्यकर्त्याचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत एका शासकीय कामासाठी शिरगाव येथील खदानी परिसरात गेले होते. ते आपल्या व्हॅगनआर कारने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.
खदान मालकाचे कृत्य?
प्राथमिक माहितीनुसार, खदान मालक महेश भोईर याने आधी आत्माराम पाटील यांच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. त्यानंतर झालेल्या वादातून पाटील यांच्यावर दगडाने भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, ही संपूर्ण घटना मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांदेखत घडली. या हल्ल्यात मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे देखील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणत वाहनाचेही नुकसान केले आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुरावे गोळा केले आहेत. आरोपी महेश भोईर याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. आत्माराम पाटील हे माहितीच्या अधिकाराचा वापर करून अनेक बेकायदेशीर कामांचा पर्दाफाश करत असत. या हत्येमागे खदानीशी संबंधित बेकायदेशीर कामांचा पाठपुरावा हेच मुख्य कारण होते की अन्य काही, याचा तपास पोलीस करत आहेत.