पुण्यातील टोळी युद्ध थांबेना, बालाजीनगर गोळीबाराबद्दल पोलिसांची मोठी माहिती, वनराज आंदेकरच्या..
Tv9 Marathi May 20, 2026 05:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळी युद्ध प्रचंड चर्चेत आहे. या टोळी युद्धामुळे पुण्यात भितीचे वातावरण आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर यांची भर चाैकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. फक्त गोळ्याच नाही तर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा कोयत्याने त्यांच्यावर असंख्य वार करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमी समोर वनराज आंदेकर उभे असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. तेव्हापासून हे टोळी युद्ध सुरू आहे. आंदेकर टोळी या हत्येचा बदला घेण्याकरिता प्रयत्न करत आहे. आता नुकताच पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भर चाैकात पुन्हा एकदा टोळी युद्धातून सकाळी हल्ला झाला. वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एका आरोपीच्या भावावर आज सकाळी हल्ला करण्यात आला.

भर रस्त्यावर ही घटना घडली. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता याबाबत मोठी माहिती पुढे येत आहे. पोलीस राजेश बनसोडे यांनी या हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, तीन ते चार लोकांनी कोयता आणि गोळीबार केला. अक्षय हा रिक्षाचालक आहे. अक्षय बाळू यांच्यावर चार राऊंड फायर करण्यात आले आहे.

सर्व पोलिस अधिकारी आरोपीचा शोध घेत आहोत. आंदेकर टोळीशी याचा संबंध आहे का याचा शोध सुरु आहे. लवकरच आरोपी जेरबंद करणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. आंदेकर टोळीच्या अॅंगलने पोलिस तपास करत आहेत. भरदिवसा गोळीबार झाल्याने बालाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण आहे. 2024 मध्ये वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर 2025 मध्ये एक वर्ष पूर्ण होताच आंदोकर टोळीने बदल म्हणून नातवालाच संपवले.

5 सप्टेंबर 2025 रोजी नाना पेठेत वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची टोळीने हत्या केली. बंडू आंदेकरसोबतच कुटुंबातील अनेक सदस्य जेलमध्ये आहेत. महापालिका निवडणुकही जेलमधूनच लढवण्यात आली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.