तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मदुराई येथील केके रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामुळे विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
केके रमेश यांनी आरोप केला आहे की, अलीकडील विधानसभा निवडणुकांनंतर TVK ने घोडेबाजार करत इतर आमदारांचा पाठिंबा मिळवला. तसेच रमेश यांनी भाजपविरोधात CBI चौकशीची मागणी केली आहे. याचिकेत भारत सरकार, CBI आणि तमिळनाडू सरकारला पक्षकार करण्यात आले आहे. आता यावर सुनावणी पार पडल्यानंतर कोर्ट काय निर्णय देते ह पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तमिळनाडूमध्ये TVK हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र, सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत त्यांच्याकडे नव्हते. या विधानसभा निवडणुकीत TVK ने 108 जागा जिंकल्या होत्या. TVK पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर काँग्रेस, CPI, CPM आणि IUML यांनी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर विजय यांनी 10 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध केले.
विजय यांच्या सरकारच्या बहुमत चाचणीत मोठा वाद निर्माण झाला. विजय यांच्या पक्षाने विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध केले तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण AIADMK चे 25 आमदार TVK च्या समर्थनार्थ उभे राहिले. त्यामुळे TVK आघाडीचा आकडा 144 च्या पुढे गेला. या घोडेबाजाराच्या विरोधात आता याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे.
तमिळनाडूमध्ये काँग्रेसचे दोन आमदार गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेस आमदार राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन तमिळनाडू सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी होणार आहेत. तब्बल 59 वर्षांनंतर काँग्रेस तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात सहभागी होत आहे.