आयपीएल 2026 स्पर्धेतील 68व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धूळ चारली. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासठी 197 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पंजाब किंग्सने दोन विकेट झटपट गमावल्या. त्यामुळे आव्हान गाठणं कठीण होईल असं वाटलं. पण कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी खेळी केली आणि संघाला संकटातून बाहेर काढलं. त्याच्या खेळीमुळे पंजाब किंग्सचा विजय सोपा झाला. या विजयासह पंजाब किंग्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. पंजाब किंग्सने सलग सहा पराभवानंतर विजयाची चव चाखली आहे. स्पर्धेच्या मध्यात टॉपला असलेल्या पंजाबची स्थिती नाजूक झाली होती. पण आता प्लेऑफसाठी जर तरच्या गणितावर अवलंबून राहावं लागणार आहे. पंजाब किंग्सच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
पंजाब किंग्सला प्रियांश आर्याच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर कूपर कोन्नोली 18 धावांवर बाद झाला. अशा स्थितीत प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 76 चेंडूत 140 धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन सिंग 39 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारत 69 धावांवर बाद झाला. अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन सिंगला पायचीत केलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने डाव पुढे नेला. श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली आणि शतक ठोकलं. या शतकासह विजय कन्फर्म झाला. तीन गडी गमवून पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला.
पंजाब किंगच्या खात्यात 2 गुण पडले असून 15 गुण झाले आहेत. तसेच चौथ्या स्थानी विराजमान झाले आहे. पण अजूनही प्लेऑफचं तिकीट मिळालेलं नाही. कारण मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात प्लेऑफचं चित्र स्पष्ट होणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली तर गाशा गुंडाळावा लागेल. पण पराभूत झाला तर मात्र पंजाब किंग्सला संधी आहे. दुसरीकडे, केकेआर दिल्ली कॅपिटल्स सामन्यातही केकेआरने सामना जिंकला आणि नेट रनरेटचं गणित सुटलं नाही तर पंजाब किंग्सचं प्लेऑफचं तिकीट पक्कं होईल. केकेआर पराभूत झाला तर मग राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये खेळेल.