कोल्हापूर : भारतात पेट्रोल डिझेलच्या सातत्याने वाढत्या किमतींमुळे देशभरात मोठ्या गोंधळाचे वातावरण आहे. (Petrol Diesel Prices) शेतकऱ्यांची मशागतपूर्व कामे खोळंबली आहेत. पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनधारकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. मे महिन्यात पेट्रोलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांवरून दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे यांच्यासह संपूर्ण टीम कोल्हापुरात होती. करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेता प्रवीण तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण तरडे म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी देऊळ बंद 2 हा चित्रपट बनवला आहे. मायबाप प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रचंड गर्दी केली चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षक या सिनेमावर जीव तोडून प्रेम करत आहे. या चित्रपटाची पब्लिसिटी आम्ही करत नाही. तर जो मराठी माणूस हा चित्रपट पाहून येतोय तो सगळीकडे जाऊन या सिनेमाविषयी बोलतोय. त्यामुळे स्नेहल आणि मोहन जोशी यांचा कौतुक आहे. देऊळ बंद हा सिनेमा केला आहे मात्र प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही नमस्कार करतोय. शेतकऱ्याच्या घरामध्ये हा सिनेमा पोहोचला पाहिजे कारण त्यांच्या मनात हा चित्रपट गेला पाहिजे. त्याच्या मनात चुकूनही वाईट विचार आला तर तो निघून गेला पाहिजे.सिनेमात शेतकरी हा प्रति परमेश्वर आहे आम्ही म्हटलं. शेतकऱ्यालादेखील असं अर्धवट सोडून आपल्याला जाता येणार नाही.”
तसेच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “जागतिक स्तरावर सध्या जे काही चालवलं आहे, ही दरवाढ त्यामुळे झाली आहे. युद्धाचे संकट मिटेल त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे आकडे पुन्हा एकदा कमी होऊ दे. आई अंबाबाईकडे हेच साकडे घातलं आहे,” असेही प्रवीण तरडे म्हणाले.
भारत त्याच्या क्रूड तेलाच्या गरजांचा जवळपास 88-90 टक्के आयात करतो, ज्यामुळे जागतिक तेलाच्या किंमतीतील हालचाली आणि रुपया-डॉलर विनिमय दरातील चढउतारांसाठी देशांतर्गत इंधनाच्या किंमती अत्यंत संवेदनशील बनतात. पश्चिम आशियातील चालू असलेल्या भू-राजकीय संकटाने भारताच्या ऊर्जा आयात बिलावर दबाव वाढवला आहे, तर पुरवठा व्यत्यय आणि उच्च मालवाहतूक आणि विमा खर्चाबद्दलच्या चिंतेमुळे शुद्धीकरण आणि इंधन विक्रेत्यांवर आणखी भार पडला आहे.