रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील ही मोठी कामगिरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट 1 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या 24 दिवसांत या चित्रपटाने भारतात 101.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा ठरला आहे.
‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाईने ओपनिंग करण्याचा, ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करण्याचा आणि एका दिवसातील मराठीतील सर्वाधिक कमाई करण्याचाही विक्रम आपल्या नावे केला आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीसुद्धा रितेशनेच सांभाळली आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शन (भारत, नेट कलेक्शन)पहिला आठवडा- 57.70 कोटी रुपये
दुसरा आठवडा- 27.00 कोटी रुपये
तिसरा वीकेंड- 8.40 कोटी रुपये
18 वा दिवस (सोमवार)- 1.25 कोटी रुपये
19 वा दिवस (मंगळवार)- 1.45 कोटी रुपये
20 वा दिवस (बुधवार)- 1.20 कोटी रुपये
21 वा दिवस (गुरुवार)- 0.95 कोटी रुपये
22 वा दिवस (शुक्रवार)- 0.70 कोटी रुपये
23 वा दिवस (शनिवार)- 1.35 कोटी रुपये
24 वा दिवस (रविवार)- 1.40 कोटी रुपये
भारतातील नेट कलेक्शन- 101.40 कोटी रुपये
‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश करणार, हे आधीपासूनच निश्चित नव्हतं. या चित्रपटावर रितेश गेल्या दहा वर्षांपासून काम करत होता. दिग्दर्शनाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेण्याआधी त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या दिग्दर्शकांकडे विचारणा केली होती. “2016 मध्ये आधी माझे मित्र आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत या चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यावेळी ते दिग्दर्शन करणार होते. दुर्दैवाने काही गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि तो चित्रपट रखडला. तीन वर्षांनंतर 2019 मध्ये नागराज मंजुळे यांच्यासोबत मी ‘राजा शिवाजी’ चित्रपट बनवण्यासाठी हातमिळवणी केली. तेव्हासुद्धा आम्ही घोषणा केली, पण नेमका कोविड आला. त्यानंतर काही वर्षे अशीच गेली आणि काहीच काम झालं नाही”, असा खुलासा रितेशने एका मुलाखतीत केला होता. गोष्टी जमून न आल्याने अखेर रितेशनेच दिग्दर्शन करायचं ठरवलं.