आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्सने धडक मारली आहे. एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आणि पुढच्या फेरीचं तिकीट मिळवलं. आता अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करणं आवश्यक आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सचा स्टार ओपनर यशस्वी जयस्वाल चर्चेत आला आहे. कारण त्याला संघ बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यशस्वी जयस्वालला हा सल्ला दुसरा तिसरा कोणी नाही तर टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने दिला आहे. त्याच्या मते वैभव सूर्यवंशीच्या झंझावातामुळे त्याचं यश झाकलं जात आहे. या पर्वात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीची चर्चा होत आहे. त्याने आक्रमक खेळी करून संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं आहे. एलिमिनेटर सामन्यात यशस्वी जयस्वालने 29 चेंडूत 97 धावा केल्या. तर जयस्वालने 29 चेंडू खेळले आणि 29 धावाच करू शकला. त्यामुळे यशस्वीला विचार करण्याची गरज आहे.
आयपीएल स्पर्धेत यशस्वी जयस्वालने आक्रमक खेळी केली नाही असं नाही. त्याने काही सामन्यात आक्रमक फटकेबाजी केली. पण वैभव सूर्यवंशीच्या झंझावातापुढे त्याची खेळी फिकी वाटत आहे. मागच्या पर्वात यशस्वी जयस्वालला जितकी लाईमलाईट मिळाली. ती आता पूर्णपणे वैभव सूर्यवंशीकडे वळली आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालचं यश फिकं पडताना दिसत आहे. असं असताना अंबाती रायुडू याने ईएसपीएल क्रिकइंफोच्या कार्यक्रमात, यशस्वी जयस्वालला टीम सोडण्याचा सल्ला दिला. कारण अशा स्थितीत वैभव सूर्यवंशीसोबत फलंदाजी करू शकत नाही. कारण जयस्वाल एक स्टार फलंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी वैभवच्या यशामुळे त्याची कामगिरी झाकली जाण्याची शक्यता आहे.
अंबाती रायुडूच्या मते, यशस्वी जयस्वालने आता राजस्थान रॉयल्स संघ सोडून दुसऱ्या संघाची कास धरली पाहीजे. कारण त्याच्याकडे आपल्या ताकदीवर सामना जिंकवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला तशाच संघाची गरज आहे. त्या संघात त्याचा स्टार फलंदाज म्हणून दर्जा राहील. रायुडूने पुढे सांगितलं की, वैभव ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. त्याच्यासोबत एका अनुभवी ओपनिंग पार्टनरची गरज आहे. हा फलंदाज आक्रमक फलंदाजीच्या बाबतीत 15 वर्षांच्या फलंदाजाशी तुलना करणार नाही. त्याचा नैसर्गिक खेळ करू शकेल. अंबाती रायुडूच्या मते, यशस्वी जयस्वालसाठी मुंबई इंडियन्स हा संघ योग्य ठरू शकेल. पण आता तसं काही होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.