क्रिकेट चाहत्यांना अवघ्या 2 सामन्यांच्या निकालानंतर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील विजेता संघ मिळणार आहे. साखळी फेरीनंतर प्लेऑफमधील 2 असे एकूण 72 सामने यशस्वीरित्या खेळवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स होणार की राजस्थान आणि गुजरातपैकी चॅम्पियन्स ठरणार? याची प्रचंड उत्सूकता चाहत्यांना लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक पातळीवर फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅपसाठीही चुरस आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ही कॅप देण्यात येते. ताज्या आकडेवारीनुसार, 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पहिल्या स्थानी आहे. वैभवने इतर सर्वांना मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं आहे. वैभवने गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन याला मागे टाकलंय. वैभवने यासह ऑरेंज कॅप जिंकण्याचा दावा आणखी मजबूत केला आहे.
वैभव सूर्यवंशी याने 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मोठी खेळी केली. वैभवने यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट पाचव्या क्रमांकावरुन पहिल्या स्थानी झेप घेतली. वैभवने हैदराबाद विरुद्ध अवघ्या 29 बॉलमध्ये 97 रन्स केल्या. वैभवच्या नावावर या सामन्याआधी एकूण 583 धावा होत्या. तर आता 15 डावांनंतर वैभवच्या नावावर 680 धावा झाल्या आहेत. वैभवने यासह 652 धावा नावावर असणाऱ्या साई सुदर्शन याला मागे टाकलं आहे. मात्र त्यानंतरही चुरस कायम आहे.
साईकडे क्वालिफायर 2 सामन्यात मोठी खेळी करुन वैभवला मागे टाकण्याची संधी आहे. इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांकडे एलिमिनेटर सामन्यात मोठी खेळी करुन या शर्यतीत राहण्याची संधी होती. मात्र दोघेही अपयशी ठरले. त्यामुळे हैदराबादचा पराभवासह स्पर्धेतून बाजार उठला.
दरम्यान साई सुदर्शन याच्याकडे सलग दुसऱ्यांदा ऑरेंज कॅपचा विजेता होण्याची संधी आहे. साई 2025 साली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. साईने तेव्हा 15 डावांत 759 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता साई सलग दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप पटकावणार की वैभव सूर्यवंशी हा मोठा बहुमान मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.