Vidhanparishad Election : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत. अशातच राजकीय घडामोडींना वेग आला. कोकणातील जागेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय वातावरण तापल्यातं पाहायला मिळत आहे. ही जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे. तर राष्ट्रवादी देखील ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
कोकणातील विधान परिषदेच्या जागेवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये सध्या जोरदार जुंपली असताना आता सुनील तटकरे आणि सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळं त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कोकणातील जागा अनिकेत तटकरे यांनाच मिळावी यासाठी तटकरे अनेक राजकीय डाव टाकत आहेत. त्यामुळे कोकणातील ही जागा अनिकेत तटकरे यांनाच मिळेल का या चर्चांना आता आल आहे. दुसरीकडे शिवसेना विकास गोगावलेंच्या माध्यमातून ही जागा लढवण्यासाठी आग्रही आहे आता नक्की या भेटीनंतर कोणाच्या पदरात ही जागा पडतेय हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्या या भेटीदरम्याचे फोटो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरच काही सांगून जात आहे. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांचा उठाव असफल ठरतोय का हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे राहील.
पूर्वीपासून कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. त्यामुळं आम्ही ही जागा राष्ट्रवादीला का द्यावी? असा सवाल आमदार महेंद्र दळवी यांनी केला. कितीही झालं तरी ही जागा शिवसेनेला मिळेल आणि आम्ही जिंकू सुद्धा. सुनील तटकरे यांना स्वतःच्या पक्षात अस्तित्व टिकवणं मुश्किलीचे झालं असताना त्यांनी या जागेवर दावा करणे हे निंदनीय असल्याचे दळवी म्हणाले. काहीही झालं तरी शिवसेना ही जागा लढवणार आहे. मंत्री भरत गोगावले हे आमचे मार्गदर्शक आणि चार टर्मचे आमदार आहेत. पालकमंत्री पद हे भरत गोगावले यांना मिळालेच पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. राष्ट्रवादी उठावाचे काम आम्ही रायगड मधून केल्याचे दळवी म्हणाले. एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला कदापी ही जागा देणार नाही असे दळवी म्हणाले. पालकमंत्री पद तुम्हाला आणि विधानपरिषद आम्हाला अस कदापी होणार नाही.