मुंबई : संगीत जगतातून अत्यंत दुःखाची आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारं आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना 'पद्मभूषण' या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील (तत्कालीन अविभाजित भारत) भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव 'हेमाडी' असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत 'सुमन हेमाडी' (Suman Hemmadi) या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली.
सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवेश अत्यंत रंजक होता. त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळे झाली होती. एका जाहीर कार्यक्रमात गाणं गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत महमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्णसंधीला होकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला. तर मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात ग. दि. माडगुळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली.
पहिलं गाणं : रुपेरी पडद्यावरचं सुमन कल्याणपूर यांचं पहिलं गाणं 'कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे' हे होतं. या गाण्याने रसिकांना त्यांच्या आवाजाची भुरळ पाडली.
तानसेन पुरस्कार : सुमन कल्याणपूर जरी शुद्ध शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताकडे फारशा वळल्या नाहीत, तरी त्यांच्या गाण्यांमध्ये कमालीची शास्त्रीय बैठक होती. त्यांनी गायलेल्या 'मन मोहन मन मे हो तुम्ही' या अजरामर गीताला मानाचा 'तानसेन पुरस्कार' लाभला होता.
विविध भाषांवर प्रभूत्व : सुमनजींनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तीगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती.
मराठी संगीत क्षेत्रात सुमनताईंचे बहुमूल्य योगदान आहे. जुन्या पिढीतील मंडळी असो वा नवोदित तरुण, आजही त्यांची गाणी प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळताना दिसतात.
लोकप्रिय चित्रपट गीते:
जिथे सागरा धरणी मिळते
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
कशी गवळण राधा बावरली
नाविका रे वारा वाहे रे
केतकीच्या बनी तेथे नाजला ग मोर
उठा उठा चिऊताई
या लाडक्या मुलांना यो
गाजलेली भावगीते आणि भक्तीगीते :
अक्रुरा नको नेऊ माधवा
आकाश पांघरुनी
केतकीच्या बनी तिथे
केशवा माधवा
जुळल्या सुरेल तारा
जेथे जातो तेथे
नकळत सारे घडले
वाट इथे स्वप्नातिल
शब्द शब्द जपुनि ठेव
सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक अथांग आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!