IPL 2026 Sunil Gavaskar : ऋषभ पंतने जबाबदारी स्वीकारली, बाकीच्यांच काय ? सुनील गावसकर यांचा LSG मॅनेजमेंटला खडा सवाल
Tv9 Marathi June 01, 2026 12:45 PM

आयपीएल 2026मध्ये निराशाजनक प्रदर्शनानंतर ऋषभ पंत याने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चे कर्णधारपद सोडलं. मात्र त्याच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ माजली असून संपूर्ण क्रिकेट विश्वात याचच बद्दल चर्चा सुरू आहे. मात्र ऋषभच्या या निर्णयाचं महान फलंदाज सुनील गावसरक यांनी उघडपणे कौतुक केलं आहे. असं असलं तरी त्यांनी त्याच वेळी एलएसजीचा सपोर्ट स्टाफ आणि संघ व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे.

आयपीएल 2026 च्या सीझनमध्ये लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि पॉईंट्स टेबलमध्ये तर संघ अगदी तळाशी राहिला. त्यानंतर ऋषभ पंतने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेऊन एक जोरदार संदेश दिला. याचबाबत ‘स्पोर्ट्स टुडे’शी बोलताना गावसकर यांनी मत मांडलं. “हा एक कौतुकास्पद निर्णय आहे, कारण संघ तळाशी पोहोचला, त्याची जबाबदारी कर्णधाराने स्वीकारली आहे. एक नेता म्हणून, तो संघाला पुढे नेऊ शकला नाही हे त्याने मान्य केलं. म्हणतात ना, अंतिमतः जबाबदारी एकाच व्यक्तीवर असते, आणि पंतने ते स्वीकारलंय ” असं गावसकर म्हणाले.

पराभवासाठी फक्त कॅप्टन जबाबदार कसा ?

मात्र एलएसजीच्या या कामगिरीसाठी फक्त ऋषभ पंतला जबाबदार ठरवण्याबद्दल सुनिल गावसकर यांनी प्रश्न उपस्थित केला. “संघाच्या खराब कामगिरीसाठी केवळ कर्णधारालाच जबाबदार धरता येणार नाही; सपोर्ट स्टाफ आणि संघ व्यवस्थापनही तितकेच जबाबदार असतात” असं गावसकर म्हणाले, “पण आता प्रश्न असा आहे की, बाकीच्यांचं काय? सपोर्ट स्टाफचं काय? संघाची निवड, रणनीती आणि डावपेचात्मक निर्णय केवळ एक व्यक्ती घेत नाही” असा सवालही त्यांनी विचारला. तसेच आयपीएल 2027 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सला मोठे बदल करावे लागतील, असे संकेतही त्यांनी दिले. जर संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफनेही स्वतः जबाबदारी घेतली, तर फ्रँचायझीने नव्याने सुरुवात केली पाहिजे, असं गावसकर यांनी नमूद केलं.

सुनील गावस्कर पुढे म्हणाले, ‘सपोर्ट स्टाफदेखील जबाबदारी स्वीकारून 2027 मध्ये एलएसजीसाठी संघाला नव्या जोमाने सुरुवात करण्याची संधी देतात की नाही, हे पाहणे रंजक ठरेल.’ यावेळी गावस्कर यांना हार्दिक पांड्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. आयपीएल 2026 मधील खराब हंगामानंतर हार्दिक मुंबई इंडियन्सच्या (MI) कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो, असे वृत्त आहे. मात्र, गावस्कर यांनी या प्रकरणात घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने थोडा वेळ घ्यावा, असे ते म्हणाले.

हार्दिक पंड्याबद्दलही गावसकर बोलले

“(याबाबत) अद्याप काहीही ठरलेलं नाही. त्या कॅम्पमधील प्रत्येकाने विचार करण्यासाठी काही आठवडे, कदाचित एखादा महिना, वेळ घ्यावा. इतका मोठा आणि भावनिक हंगाम खेळल्यानंतर, लोकांना स्वतःला सावरण्यासाठी वेळेची गरज असते. त्यानंतर, हार्दिकशी बोलून भविष्याबद्दल निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.”असा सल्ला गावसकर यांनी दिला.

” एखाद्या कठीण हंगामानंतर लगेचच घेतलेले निर्णय अनेकदा भावनेच्या भरात घेतले जातात. म्हणूनच सर्व पक्षांनी शांत मनाने, भविष्यासाठी नियोजन करणे अधिक चांगलं ठरेल” असा सल्ला त्यांनी दिला. आयपीएल 2027 पूर्वी लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. गावसकर यांच्या वक्तव्यामुळे आयपीएल संघांमधील नेतृत्व, जबाबदारी आणि व्यवस्थापनाच्या भूमिकेबद्दल एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.