अध्यक्ष राहुल सिंह अन् सचिव गुप्ता यांची बदली : ओएसएम खरेदी प्रक्रियेची होणार चौकशी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीबीएसईशी निगडित प्रकरणांमध्ये मोठे प्रशासकीय पाऊल उचलत केंद्र सरकारने बोर्डाचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली केली आहे. याचबरोबर सीबीएसईकडून ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) सेवांच्या खरेदी प्रक्रियेच्या चौकशीसाठी एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही चौकशी समिती ओएसएम सेवांची खरेदी, निविदा प्रक्रिया आणि त्याच्याशी निगडित विविध पैलूंची पडताळणी करणार आहे. जारी आदेशानुसार या चौकशी समितीचे अध्यक्षत्व कॅपेसिटी बिल्डिंग कमिशनच्या अध्यक्ष एस. राधा चौहान यांच्याकडे असणार आहे. समितीला सीबीएसईकडून ओएसएम सिस्टीमसाठी सेवांच्या खरेदीशी निगडित सर्व प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अन्य अधिकाऱ्यांची मदत घेता येणार
समितीच्या अध्यक्ष एस. राधा चौहान आवश्यकता भासल्यास अन्य विभाग आणि कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचे सहाय्य देखील मिळवू शकणार आहेत. तर समितीला सचिवीय सहाय्यता कॅपेसिटी बिल्डिंग कमिटीकडून उपलब्ध करविण्यात येणार आहे.
एक महिन्यात अहवाल
सरकारने चौकशी समितीला स्वत:चा अहवाल एक महिन्याच्या आत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला सोपविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली, मूल्यांकन प्रक्रिया आणि ओएसएम निविदा प्रक्रियेवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याचदरम्यान विद्यार्थी आणि विविध संघटनांनी देखील पारदर्शकता तसेच उत्तरदायित्वाची मागणी केली होती. आता सरकारचा हा निर्णय सीबीएसई प्रकरणांमध्ये उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
ओएसएमध्ये 15 त्रुटी
ओएसएम प्रणालीत गैरप्रकारांचा खुलासा करणारा 12 वीचा विद्यार्थी सार्थक सिद्धांत मंगळवारी दुपारी एक वाजता संसदेच्या स्थायी समितीसमोर उपस्थित राहिला. एखाद्या प्रकरणामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला स्वत:चे म्हणणे मांडण्यासाठी बोलाविण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. ओएसएम प्रणाली लागू होणे आणि याच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततांवरून सार्थकने समितीसमोर भूमिका मांडली. ओएसएम प्रणालीत कमीतकमी 15 त्रुटी असल्याचे त्याने सांगितले आहे.
पोर्टलवर सायबर अटॅक
सीबीएसईच्या री-इवॅल्युएशन पोर्टलवर सायबर अटॅक झाला आहे. सीबीएसईनुसार 2 मिनिटांत 15 लाख अॅक्सेस अटेंप्ट झाले, तर 1 लाखाहून अधिक वेळा सिस्टीमच्या फाइल्सपर्यंत विनाअनुमती पोहोचण्याचा प्रयत्न झाला. सायबर हल्ल्यानंतरही पोर्टल काम करत राहिले. दुपारी 3 वाजेपर्यंत 16 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले.