तात्या लांडगे
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या पडताळणीत सोलापूर जिल्ह्यातील १५ हजार ५३० महिलांचे वय ६५ वर्षांवर असल्याचे आढळले आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त, अशा सुमारे एक लाख १३ हजार लाडक्या बहिणी समोर आल्या. त्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे त्या ६५ वर्षांवरील वृद्ध व एकाच कुटुंबातील दुसरी-तिसरी लाडकी बहीण जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून लाभ बंद झाल्याचे प्रमाणपत्र (एनओसी) घेत आहेत. त्या पुढे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज करीत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्यानंतर आता ६५ वर्षांवरील महिला राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज करु लागल्या आहेत. वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये असलेल्या महिला येथे अर्ज करु शकतात. योजनेतून लाभार्थीस दरमहा दीड हजार रुपये मिळतात. दुसरीकडे ० ते ६५ वर्षांखालील महिला, तरुणींना संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करता येतो. त्यासाठी लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये (दिव्यांग लाभार्थीसाठी ५० हजार रुपये उत्पन्नाची अट आहे) असणे आवश्यक आहे.
या योजनेतूनही लाभार्थीस दरमहा १५०० रुपयेच (दिव्यांगांना दरमहा २५०० रुपये) मिळतात. तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला आणि महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याची ‘एनओसी’ घेऊन त्या महिलांनी शासनाच्या दुसऱ्या योजनांसाठी अर्ज केले आहेत. काही महिन्यांत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेसाठी महिलांचे अर्ज वाढल्याचेही तहसीलदार शिल्पा पाटील यांनी सांगितले.
लाभ बंद झाल्याचे प्रमाणपत्र घ्यायला महिला कार्यालयात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची निकषांनुसार पडताळणी झाली. त्यात अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. त्या महिला आता आमच्या कार्यालयाकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याची ‘एनओसी’ घेत आहेत. त्यांना आम्ही तसे प्रमाणपत्र देत आहोत. त्या महिला शासनाच्या दुसऱ्या योजनांसाठी अर्ज करीत आहेत.
- अविनाश मगर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सोलापूर
अंदाजे ५ लाख ‘लाडकीं’चा लाभ बंद
सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ३० हजार ५६३ महिलांनी सुरवातीपासून लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपयांचा लाभ घेतला. मात्र, आता ई-केवायसी न केलेल्या सुमारे सव्वा लाख महिलांसह ६५ वर्षांवरील साडपंधरा हजार महिला, साडेतीन हजार १८ वर्षांखालील तरुणी, चारचाकी असलेल्या आठ हजार महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या आणि शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, अशा एकूण अंदाजे पाच लाख लाडक्या बहिणी लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत.