राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं, परंतु शेवटच्या क्षणी ही बंडखोरी मोडून काढण्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागांवर मात्र मोठा धक्का बसला आहे. ऐनवेळी उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेताच निवडणुकीतून माघार घेतली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. तसेच छत्रपती संभाजीनगर -जालना विधान परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी देखील या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
दरम्यान त्यानंतर जळगावमध्ये अशी स्थिती होऊ नये, उमेदवाराने माघार घेऊ नये म्हणून जळगावमधील विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला थेट मुंबईत बोलवून घेण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी घेत उमेदवार शरद तायडे यांना थेट मुंबईत बोलवून घेण्यात आले.
उमेदवाराने माघार घेऊ नये, यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या माध्यमातून शरद तायडे यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांकडून दबाव व माघारीचा संभाव्य धोका लक्षात घेत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाराला मुंबईत बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे निवडणुकीच्या रिंगणात आहे. शरद तायडे यांच्यासोबत ठाकरे गटाचे जळगावचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील हे देखील मुंबईत होते. अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर शरद तायडे यांनी संजय राऊत यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जळगाव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी देखील या वृत्ता दुजोरा दिला.