बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा युनेस्कोच्या नव्याने जाहीर झालेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेला नाही. उल्कापातातून निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगातील महत्त्वाच्या भूवैज्ञानिक वारसांपैकी एक मानले जाते. नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असूनही जागतिक वारसा दर्जासाठीचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे लोणारकरांची प्रतीक्षा आणखी वाढली असून, भविष्यात या अद्वितीय स्थळाला जागतिक वारसा दर्जा मिळावा, अशी मागणी लोणारकर करीत आहे.
FDA ची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धडक कारवाई,अन्न व औषध प्रशासनाने समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या एका वाहनाला अडवून प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाचा सावंगी ते माळीवाडा टोलनाक्यादरम्यान पाठलाग करून वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहनातून सुमारे 42 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा तसेच 18 लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले असून, एकूण 60 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्तजालन्यात पोलिस आणि महसूलच्या पथकाने वाळू माफियांना दणका दिलाय . गोंदी पोलिस आणि महसूल पथकाने कारवाई करत 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध वाळू चोरीचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आणि महसूल पथकाच्या या कारवाईमुळे जालन्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
कोल्हापूर तवंदी घाटात मुसळधार पाऊस, महामार्गावर पाण्याचा लोटपुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील निपाणीजवळच्या तवंदी घाट परिसरात काल सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या काही वेळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी थेट महामार्गावरून वाहू लागले. घाटातील डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल तसेच महामार्गाच्या कामासाठी ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्य वाहून रस्त्यावर आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. एका बाजूच्या मार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दुसऱ्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. तवंदी घाट परिसरातील मुसळधार पावसाचे हे दृश्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.