Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे… माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
Tv9 Marathi June 05, 2026 04:45 PM

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप करत निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि काही जागा बिनविरोध करण्यासाठी तब्बल 150 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप केला.

संजय राऊत म्हणाले की, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणासह अनेक ठिकाणी उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यात आले. “दिवसभरात सुमारे 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारांना माघार घेण्यासाठी मोठ्या रकमा देण्यात आल्या. कोकणातील एका माघारीसाठी 25 कोटी रुपये दिल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्यातील 15 कोटी रुपये मुंबईतील बीकेसी परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत विचारले की, “तुमच्याकडे आधीच स्पष्ट बहुमत आणि संख्याबळ असताना घोडेबाजार करण्याची गरज काय आहे?” तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी खर्चात काटकसरीचा सल्ला देतात, मग निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्यास परवानगी आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करत, “हे प्रकार केवळ लोकशाहीसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रतिमा, संस्कृती आणि राजकीय परंपरेलाही काळिमा फासणारे आहेत,” असे मत व्यक्त केले. दरम्यान, राऊत यांच्या आरोपांमुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.