कसोटी क्रिकेटमधील नव्या नियमाने गौतम गंभीर खूश, म्हणाला की…
GH News June 05, 2026 10:12 PM

भारतीय संघ दोन महिन्यांच्या आयपीएल ब्रेकनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा पहिला कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे. हा सामना 6 जूनपासून सुरू होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आयसीसीने प्रायोगिक तत्त्वावर एक नियमाची अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट आणखी रोमांचक होण्यास मदत होणार आहे. अनेकदा अपुऱ्या प्रकाशामुळे 90 षटकांचा खेळ पूर्ण होत नाही. त्यामुळे कधी कधी हातातला सामना गमवण्याची वेळ येते. पण आयसीसीच्या नव्या नियमानुसार, सूर्यप्रकाश कमी असल्यास दोन्ही संघांच्या संमतीने फ्लडलाइट्स सुरू केली जाऊ शकते. तसेच गुलाबी चेंडूचा वापर केला जाऊ शकतो. या नियमाला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पाठिंबा दिला आहे. तसेच हा नियम योग्य का आहे? याबाबतही विश्लेषण केलं आहे.

गौतम गंभीर म्हणाला की, “मला हा नियम आवडतो. कारण माझा नेहमीच विश्वास आहे की, जर बाद होण्याची संधी असेल, तर ती संधी तुम्हाला नेहमीच मिळाली पाहिजे. कल्पना करा की तुम्ही विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वीचा शेवटचा कसोटी सामना खेळत आहात आणि तो सामना जिंकून पात्र होण्याची संधी तुमच्याकडे आहे. अपुऱ्या प्रकाशामुळे तसे होत नाहीये. जर निकाल मिळण्याची संधी असेल आणि दोन्ही संघ त्यावर सहमत असतील, तर मी त्यासाठी तयार आहे.” कसोटीत लाल चेंडूचा सामना करत असताना शेवटच्या काही षटकात गुलाबी चेंडूंचा सामना करणं सोपं नाही असंही त्याने सांगितलं.

साई सुदर्शनबाबत काय म्हणाला?

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर साई सुदर्शनबाबत म्हणाला की, “साई सुदर्शनला योग्य संधी मिळालेली नाही. तो बहुतेक इंग्लंडमध्ये खेळला आहे आणि माझ्या मते त्याला एक योग्य संधी मिळायला हवी. आम्ही फक्त 11 खेळाडू निवडू शकतो आणि साई खराब फॉर्ममध्ये नाही. त्याने आयपीएल 2026 मध्ये 700 धावा केल्या आहेत. जर आपण साईला 4-5 सामन्यांच्या आधारावर पारखले, तर आपण कधीही एक मजबूत संघ तयार करू शकणार नाही.’ म्हणजेच साई सुदर्शनची प्लेइंग 11 मधील जागा पक्की असल्याचं गौतम गंभीरने अस्पष्टपणे सांगितलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.