Onion Farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय, इतके दिवस कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं
Tv9 Marathi June 06, 2026 05:45 PM

मागच्या अनेक दिवसांपासून कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण कांद्याला योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे कांद्याचं पीक घेणारा शेतकरी त्रस्त झालेला. या कांद्याच्या मुद्यावरुन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आंदोलनं झाली. आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. नाफेड आणि NCCF कडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय झाला आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर नाफेड आणि nccf कडून निश्चित झाला आहे. अनेक वर्षांपासून नाफेड आणि nccf ने थेट बाजार समितीत कांदा खरेदी करावी, अशी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून मागणी सुरु होती.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, नाफेड, NCCF आणि बाजार समिती प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा. या निर्णयामुळे कांद्याचे दर वाढण्यासाठी मदत होणार.

शासनाचे अधिकारी सहभागी होणार

“अनेकदा पाठपुरावा करूनही नाफेड आणि NCCF बाजारात येऊन खरेदी करत नव्हते. आज महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. आता NCCF आणि नाफेड मार्केट मध्ये येऊन माल खरेदी करणार आहेत. भुजबळ साहेब, दादा भुसे यांच्या सूचनेनुसार काम सुरू झालं आहे. शासनाचे अधिकारी सहभागी होणार आहेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर म्हणाले. “सोमवार पासून 1580 नुसार नाफेड आणि NCCF शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार आहेत. हे आल्यानंतर स्पर्धा तयार होणार आहे. खराब माल खरेदी करायचा आणि तीन महिन्यानंतर सरकारला द्यायचा असा प्रकार सुरू होता” असं बनकर म्हणाले.

दोषींवर कारवाई झाली पाहिजे

“एका गोष्टीला यश आलं आहे. कांदा खरेदी होणार आहे. ज्या दिवशी कांदा खरेदी झाला, त्याच दिवशी नोंद होणार आहे, शेतकऱ्यांची देखील नोंद होणार आहे. आज पर्यंत एकही कांदा नाफेड आणि NCCF ने खरेदी केलेला नाही. नाफेड NCCF मध्ये घोटाळा झाला असेल तर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही” असं दिलीप बनकर म्हणाले.

खरेदी मार्केट मध्ये व्हावी अशी आमची मागणी

“कांदा उत्पादकांना रास्त भाव मिळावा यासाठी मागच्या आठवड्यात बैठक झाली. नाफेड आणि NCCF मार्फत कांद्याची खरेदी करण्यावर चर्चा झाली. नाफेड आणि NCCF मार्फत होणारी खरेदी मार्केट मध्ये व्हावी अशी आमची मागणी होती. आज बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. NCCF आणि नाफेड मार्फत कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीतच होणार आहे” असं भाजप आमदार राहुल आहेर यांनी सांगितलं.

10 लाख टन खरेदी करावी

“सुरुवातीचे निकष A ग्रेड कांदा खरेदी साठी होते. आता मात्र URS खरेदी देखील होणार आहे. सरकारने दिलेल्या किंमती नुसारच खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज 1700 ते 1800 दर मिळतो आहे. शेतकऱ्यासाठी देखील हे ऐच्छिक राहणार आहे. NCCF आणि नाफेडला मात्र शेतकऱ्यांचा कांदा घ्यावाच लागणार आहे. 2 लाख टन कांदा खरेदी ही कमी खरेदी आहे. 10 लाख टन खरेदी करावी या आमच्या सूचना आहेत. प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये जिथे खरेदी होणार, त्याठिकाणी 3 विभागाचे 3 अधिकारी असणार आहेत” असं राहुल आहेर म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.