नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन माननीय पंतप्रधानांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा मेट्रो, उपनगरीय रेल्वे किंवा बसने प्रवास करण्याचे प्रोत्साहन देणारे परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमएमआरडीएने डब्ल्यूआरआय इंडियाच्या सहकार्याने ‘बीकेसी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. भारतातील एखाद्या व्यावसायिक केंद्रासाठी राबविण्यात येणारा हा पहिलाच उपक्रम आहे.
या उपक्रमाची घोषणा वरिष्ठ शासकीय अधिकारी, वाहतूक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि गतिशीलता क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत करण्यात आली. या परिषदेत वांद्रे-कुर्ला संकुलातील कर्मचारी आणि संस्थांनी दर शुक्रवारी सार्वजनिक किंवा सामायिक वाहतुकीने प्रवास करण्यास प्रोत्साहन देण्याचा सामूहिक ठराव स्वीकारण्यात आला.
दोन लाख लोकांना आवाहनभारताचे आघाडीचे व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीकेसीमध्ये जवळपास 2 लाख औपचारिक रोजगार आहेत, तर अनौपचारिक रोजगारांची संख्याही तितकीच किंवा त्याहून अधिक आहे. बीएसई सेन्सेक्समधील 75 टक्के कंपन्या आणि निफ्टी 50 मधील 50 टक्के कंपन्या बीकेसीमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे बीकेसी हे देशातील अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपैकी एक मानले जाते.
सार्वजनिक वाहतुकीची सुविधा वाढत असतानाही, गोलमेज परिषदेत सादर करण्यात आलेल्या गतिशीलता अभ्यासातून असे दिसून आले की, 52 टक्के प्रवासी अद्यापही वैयक्तिक वाहने, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षांवर अवलंबून आहेत, तर केवळ 25 टक्के प्रवासी दैनंदिन प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. 54 टक्क्यांहून अधिक प्रवाशांना दररोज प्रवासासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, तर प्रत्येक पाच प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा प्रवास तीन तासांपेक्षा अधिक असतो.
अभ्यास काय सांगतो?या चर्चेत बीकेसीकडे येणाऱ्या प्रवाशांसमोरील वाहतूक कोंडी, अपुरी फर्स्ट-अँड-लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी आणि मर्यादित वाहतूक पर्याय ही प्रमुख आव्हाने असल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्याचवेळी, सर्वेक्षणातील निष्कर्षांमधून बदलाची मोठी संधीही दिसून आली. सार्वजनिक वाहतूक अधिक विश्वासार्ह, आरामदायी आणि सोयीस्कर झाल्यास 82 टक्के प्रवासी सार्वजनिक वाहतुकीकडे वळण्यास तयार असल्याचे या अभ्यासातून समोर आले.
बीकेसी हे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असून, सामूहिक प्रयत्नांमुळे शहरी गतिशीलतेत कसा बदल घडू शकतो, हे दाखवून देण्याची मोठी क्षमता बीकेसीमध्ये आहे. मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागांतून जवळपास दोन लाख व्यावसायिक दररोज बीकेसीमध्ये प्रवास करतात. सार्वजनिक वाहतूक आणि सामायिक वाहतुकीकडे झालेला अगदी मर्यादित बदलही वाहतूक कोंडी कमी करण्यास, प्रवासाची कार्यक्षमता वाढविण्यास, उत्सर्जन कमी करण्यास आणि जीवनमान सुधारण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतो. साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिनाच्या माध्यमातून आम्ही असा उपक्रम सुरू करत आहोत, जो देशातील इतर व्यावसायिक केंद्रांसाठी आदर्श ठरू शकतो, असं एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितलं.
अर्थपूर्ण बदलाची सुरुवात प्रत्येक व्यक्तीकडून होते. एमएमआरडीएचा महानगर आयुक्त म्हणून, आपण स्वतः उदाहरण निर्माण करणे आवश्यक आहे, असा माझा विश्वास आहे. मी आणि माझी संपूर्ण एमएमआरडीए टीम या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची आणि शाश्वत गतिशीलतेची संस्कृती रुजविण्याची प्रतिज्ञा करतो. छोट्या पण सातत्यपूर्ण कृतींमधून आपण मिळून अधिक स्वच्छ, हरित आणि कार्यक्षम मुंबई घडवू शकतो, असंही मुखर्जी म्हणाले.
बीकेसी नव्या कनेक्टिव्हिटीच्या टप्प्यात प्रवेश करत असताना या उपक्रमाचे महत्त्व अधिक वाढते. नुकतीच कार्यान्वित झालेली मेट्रो मार्गिका 3 बीकेसीच्या काही भागांना जलद सार्वजनिक वाहतुकीच्या चालण्याजोग्या अंतरात घेऊन आली आहे. आगामी मेट्रो मार्गिका 2बी आणि 4 कार्यान्वित झाल्यानंतर जवळपास संपूर्ण बीकेसी परिसर मेट्रो स्थानकापासून एक किलोमीटरच्या आत येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शाश्वत प्रवासासाठी अभूतपूर्व संधी निर्माण होणार आहेत.
काय झाली चर्चा?या गोलमेज परिषदेत सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये फीडर बस सेवा अधिक मजबूत करणे, पादचारी सुविधा सुधारणे, मुंबई वन प्लॅटफॉर्मशी अधिक चांगले एकत्रीकरण करणे, ट्रान्झिट हबजवळ समर्पित ऑटो-रिक्षा सुविधा उपलब्ध करणे आणि शाश्वत वाहतूक पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारे कॉर्पोरेट प्रोत्साहन कार्यक्रम राबविणे यांचा समावेश आहे. बेंगळुरूमध्ये राबविण्यात आलेल्या यशस्वी वर्तनबदल उपक्रमांपासूनही या चर्चेला प्रेरणा मिळाली. अशा कॉर्पोरेट मोबिलिटी कार्यक्रमांमुळे एका महिन्यात 36000 हून अधिक मेट्रो प्रवास नोंदवले गेले होते.
एमएमआरसी, एमएमएमओसीएल, बेस्ट उपक्रम, मुंबई वाहतूक पोलीस, बीकेसी स्थित आघाडीच्या कंपन्या, बीकेसी मूव्ह्स कलेक्टिव्हचे सदस्य आणि गतिशीलता तज्ज्ञ या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. सर्वांनी संयुक्त प्रयत्नांद्वारे शाश्वत गतिशीलता पुढे नेण्याची बांधिलकी व्यक्त केली.
‘बीकेसी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवरील आदर्श ठरण्याची अपेक्षा आहे. शासन संस्था, वाहतूक सेवा पुरवठादार, उद्योगक्षेत्र आणि नागरिक एकत्रितपणे काम केल्यास अधिक स्वच्छ, कमी गर्दीची आणि अधिक शाश्वत शहरी केंद्रे निर्माण करता येऊ शकतात, हे या उपक्रमातून स्पष्ट होणार आहे.