नवी दिल्ली : इंडिया आघाडीची नवी दिल्लीत 8 जूनला बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तामिळनाडूत थलपती विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्यापूर्वी द्रमुकला माहिती दिली होती, असं चिदंबरम म्हणाले. तामिळनाडूत काँग्रेसनं द्रमुक सोबत निवडणूक लढवली होती. मात्र, निकालानंतर त्यांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला होता. टीव्हीकेला पाठिंबा देणार पहिला पक्ष काँग्रेस होता.
काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पहिल्यांदा पाठिंबा दिला होता. थलपती विजय यांचं सरकार तामिळनाडूमध्ये स्थापन होण्यामध्ये काँग्रेसनं दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला होता. चिदंबरम यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटलं की ' जर टीव्हीके सभागृहात बहुमत सिद्ध करु शकली नसती तर तशा स्थितीत निवडणूक लागली असती. आम्हाला निवडणूक टाळायची होती. आघाडीच्या सहकाऱ्यांची देखील व्यापक भूमिका हीच होती, जनतेला देखील पुन्हा निवडणूक नको, होती, असं चिदंबरम म्हणाले.
पी. चिदंबरम यांनी पुढं म्हटलं की त्यांनी टीव्हीके सरकारला पाठिंबा देण्यासंदर्भात सीपीआय, व्हीसीके आणि इंडियन यूनियन मुस्लिम लीगसह इतर मित्रपक्षांना माहिती दिली होती. आम्ही टीव्हीकेला पाठिंबा देण्याची घोषणा आमच्या मित्रपक्षांच्या एक दिवस अगोदर केलेली, एवढाच फरक असल्याचं चिदंबरम म्हणाले.
द्रमुक आणि काँग्रेस आघाडीचा तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वातील द्रमुकच्या युवा आघाडीनं बैठक बोलावली होती. त्या बैठकीत द्रमुकवर विश्वासघाताचा आरोप करण्यात आला होता. द्रमुकचे नेते टी. आर. बालू यांनी काँग्रेसनं द्रमुक आघाडीला मतदान करणाऱ्यांचा विश्वासघात केल्याचं म्हटलं होतं.
थलपती विजय यांच्या पक्षाचा 108 जागांवर विजय
तामिळनाडू विधान सभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या नेतृत्त्वातील टीव्हीकेनं 108 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा 118 होता. टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी 10 आमदारांची गरज असताना सुरुवातीला काँग्रेसनं थलपती विजय यांना पाठिंबा दिला. त्यानंतर व्हीसीके, भाकप, माकप या पक्षांनी देखील थलपती विजय यांना पाठिंबा दिला. यानंतर थलपती विजय यांचं सरकार स्थापन झालं.