महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. तळ कोकणात मान्सून दाखल झाला आहे. यंदा देशात विलंबनानं मान्सूनचं आगमन झालं. काही दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला, त्यानंतर आता मान्सून शनिवारीच तळ कोकणात दाखल झाला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामना विभागानं राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार ते पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अकोला जिल्हात पावसाचा यलो अलर्ट
अकोला जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, 6 जून ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही ठाकाणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान जर पावसाचं आगमन झालं तर गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आल्यानं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मात्र तरी देखील संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी मान्सूनला आणखी काही वेळ लागू शकतो, येत्या 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने ट्विट करत देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्याची घाई करू नये, असं आवाहानही करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे.