काही गावांमध्येच लोड शेडिंग का? 'हे' आहे मुख्य कारण; सिंगल फेजवर कृषीपंप जोडणी, आता वीज चोरी थांबली नाही तर पावसाळ्यातही गावे राहणार अंधारात, वाचा...
esakal June 08, 2026 04:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : शेती व घरगुती विजेचे कनेक्शन एकाच लाइनवरून (फीडर) आहे, त्या गावांमध्ये सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत विजेचा वापर वाढला आहे. अनेकजण सिंगल फेजवर कृषीपंप जोडत आहेत, तर काहीजण तारांवर आकडे टाकून वीज चोरी करीत आहेत. आता अशा गावांमधील वीज चोरी कमी झाल्याशिवाय तेथील लोडशेडिंग थांबणार नाही, असे ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

‘महावितरण’ने गावागावांमध्ये ‘आरडीएसएस’ योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत वीज बिलिंग अचूक व्हावे, वीज गळती थांबावी यासाठी वीज ग्राहकांच्या घरी व कार्यालयांमध्ये आधुनिक स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. तसेच वीज वितरण जाळ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन उपकेंद्रे उभारणे, ट्रान्सफॉर्मर बसविणे, जुन्या वाहिन्या बदलणे आदी कामेही केली जात आहेत.

याशिवाय शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत व स्वतंत्र वीजपुरवठा मिळावा म्हणून कृषी फीडरचे विलगीकरण केले जात आहे. मात्र, काही गावांमध्ये या कामांना विरोध झाला. अनेकांनी आमच्या जमिनीत विजेचे खांब उभारू नयेत, अशी भूमिका घेतली होती. परंतु, आता लोडशेडिंग सुरू झाल्याने अनेक गावांनी ‘आरडीएसएस’ची कामे करण्याचा आग्रह धरला आहे.

शेती व घरगुती विजेचे फीडर वेगळे केल्यानंतर गावांचा वीजपुरवठा २४ तास सुरळीत राहणार आहे. मात्र, ज्या गावांमध्ये शेती व घरगुती कनेक्शन एकाच फीडरवर आहे, तेथील वीज चोरी न थांबल्यास वीज कपात उन्हाळा असो वा पावसाळा, सुरूच राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

...तरच वीजपुरवठा सुरळीत होईल

सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये सध्या रात्रीच्या वेळी अपेक्षेपेक्षा जास्त वीज वापर होत आहे. ज्या गावांमध्ये सिंगल फेजवर गावठाणातील घरगुती कनेक्शन आणि शेतीचे कनेक्शन एकत्रित आहेत, तेथे अशी स्थिती आहे. त्यामुळे वीज चोरी रोखण्यासाठी त्या फीडरवरील वीज सायंकाळी ६ ते रात्री सव्वानऊ किंवा दहा वाजेपर्यंत बंद ठेवली जात आहे. गावकऱ्यांनी वीज चोरी रोखण्यासाठी ‘महावितरण’ला सहकार्य केल्यास वीजपुरवठा सुरळीत राहील.

- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

चार तासांचे लोडशेडिंग, तरीही विजेचा लपंडाव

शेती व घरगुती विजेची लाईन एकत्रित आहे, अशा गावांमधील फीडर काही तास बंद ठेवले जात आहेत. मागील दोन महिन्यांपासून लोडशेडिंगचा अनुभव गावकरी घेत आहेत. सायंकाळी ६ वाजता गेलेली वीज रात्री १० वाजता येते. तरीही मध्यरात्री दीड-दोन वाजेपर्यंत किमान ८ ते १० वेळा वीज ये-जा होत असल्याचा अनुभव गावकरी सांगत आहेत.

सोलापुरातील ‘महावितरण’ची स्थिती

  • एकूण फीडर

  • १,५०२

  • शेती-घरगुती एकत्रित फीडर

  • ६७१

  • शेती-घरगुती स्वतंत्र फीडर

  • ४७४

  • भारनियमनाची वेळ सायंकाळी

  • ६ ते रात्री १०

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.