अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
विशाल देवकर June 08, 2026 02:13 PM

Akhilesh Yadav on Ayodhya Ram Temple : अयोध्या राममंदिरासाठी (Ayodhya Ram Mandir) जमा करण्यात आलेल्या वर्गणीत घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप  समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी केला आहे. अशातच अखिलेश यादवांचा हा दावा विश्वस्त दिनेंद्र दास यांनी फेटाळलाय. असा कोणताही घोटाळा झालेला नाही, सर्व विश्वस्तांवर विश्वास असल्याचं ते म्हणाले. मात्र तरीही कोणाला शंका असल्यास चौकशी होऊ देण्यासही हरकत नाही, असं त्यांनी म्हटलंय. कोणी काही चुकीचं केलं असेलच तर त्याला प्रभू श्रीराम शिक्षा करतील असंही ते म्हणाले. असं असताना, राम मंदिरात देणगी मोजणी दरम्यान देणगीच्या कथित अपहार प्रकरणी राम मंदिर परिसरात रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता आणि चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ट्रस्टने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यातून मुक्त केले आहे. (Ayodhya Ram Temple trust donation box theft case) 

Ayodhya Ram Temple : पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?

दरम्यान, या अपहारानंतर अधिकारी रात्री उशिरापर्यंत राम मंदिर परिसरात उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देणगी पेटीत देणगी मोजण्यासाठी तैनात असलेल्या एसबीआयच्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौघांकडून वसुली करण्यात आली आहे. यात्री सुविधा केंद्रातूनही वसुली करण्यात आली आहे. मात्र या चौकशीबाबत पोलीस अधिकारी आणि ट्रस्टचे अधिकारी मौन बाळगून आहेत.

Akhilesh Yadav : मंदिर ट्रस्टसाठी ही एक अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती

एकंदरीत या सर्व प्रकरणावर समाजवादी पक्षाचे (एसपी) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी दावा केला की, अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केलेले कोट्यवधी रुपये गायब झाले आहेत. अखिलेश यादव यांनी न्यायालयाला या प्रकरणाची स्वतःहून दखल घेण्याची विनंती केली. रविवारी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले, "जगभरातील प्रभू रामाच्या भक्तांसाठी ही एक अत्यंत संवेदनशील बातमी आहे की राम मंदिरासाठी दान केलेले कोट्यवधी रुपये गायब झाले आहेत." अखिलेश यादव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, "मंदिर ट्रस्टसाठी ही एक अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती आहे. स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीही पुढे येऊ इच्छित नाही." माजी मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले, "न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, कारण याचा थेट संबंध जगभरातील संपूर्ण सनातनी समाजाच्या प्रभू रामावरील गाढ श्रद्धेशी आहे. सरकारचे मौन संशयास्पद आहे."

Akhilesh Yadav : राम मंदिर ट्रस्टच्या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह

तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनी राम मंदिर ट्रस्टच्या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अखिलेश यादव यांनी राम मंदिर ट्रस्टच्या स्पष्टीकरणावर टीका केली. त्यांनी ट्विट केले, "हे स्पष्टीकरणच अस्पष्ट आहे. असे दिसते की त्यांच्यासाठी ही एक साप्ताहिक घटना बनली आहे आणि इतकी सामान्य झाली आहे की ते आता याला 'लक्षणीय' मानत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली निराशा आणि हताशेने भरलेली आहे. स्पष्टीकरण देण्यासाठी ट्रस्टच्या सर्व सदस्यांना एकत्र आणले पाहिजे आणि डेटाची पडताळणी करण्यासाठी सीसीटीव्ही पुराव्याचा वापर केला पाहिजे. एकदा सर्व विश्वस्त एकत्र आले की सत्य लगेच समोर येईल. कारण प्रत्येकजण सारखा नसतो. जेव्हा या फसवणुकीच्या संशयाच्या केंद्रस्थानी एकही व्यक्ती नाही, तेव्हा कोणत्याही एका व्यक्तीच्या स्पष्टीकरणाला काय महत्त्व आहे? हे देखील स्पष्ट केले पाहिजे की ४० सेकंदांच्या स्पष्टीकरणाला इतके तास का लागले आणि स्पष्टीकरणाच्या नावाखाली एक मिनिट बोलणे देखील इतके महाग का पडत आहे. राज्य सरकारच्या मौनाप्रमाणेच हे स्पष्टीकरणही संशयास्पद आहे." हे स्पष्टीकरण केवळ एक शाब्दिक औपचारिकता आहे असे वाटते. या अत्यंत कमकुवत स्पष्टीकरणामुळे संपूर्ण जगातील सनातन समाज अधिकच चिंताग्रस्त आणि दुखावला गेला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.