राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
माध्यमांशी संवाद साधताना दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबतही महत्त्वाचा सल्ला दिला. 12 जून ते 15 जूनदरम्यान पडणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांत सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी घाई न करता हवामानाचा अंदाज पाहून निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मे आणि जून महिन्यात झालेल्या वादळी पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांना मोठा फटका बसल्याची माहिती त्यांनी दिली. जळगाव, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले असून, सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खतांच्या उपलब्धतेबाबत बोलताना भरणे म्हणाले की, युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीच्या योजनेतील अटींमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय भरणे यांनी, “भुजबळ हे ज्येष्ठ आणि लढवय्ये नेते आहेत. ते नाराज नसून राज्यसभा उमेदवारीबाबतचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतला आहे,” असे सांगितले.
या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.