राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अलीकडेच व्हायरल झालेल्या प्रकरणावर स्पष्टीकरण देत संबंधित व्यक्तीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि खोट्या माहितीचा वापर करून आपली दिशाभूल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत.
रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना संबंधित जमीन व्यवहार प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. “मी कोणत्याही व्यवहारात भागीदार नव्हते. माझ्याविरोधात चुकीची माहिती पसरवण्यात आली,” असे त्या म्हणाल्या. तसेच, या प्रकरणात आपल्यावर टीका करणाऱ्या काही व्यक्तींना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. “आशा मिरगे यांच्यासह अनेकांना नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्या सुनावणीवेळी मीही उपस्थित राहणार आहे,” असे चाकणकर यांनी सांगितले.
दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, संबंधित व्यक्तीविरोधात महिलांच्या तक्रारी समोर येत असताना रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. अशा परिस्थितीत महिलांच्या तक्रारी मिळूनही योग्य कारवाई झाली नाही, असा आरोप ठोंबरे यांनी केला.
तसेच, “महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या संवैधानिक पदावर असताना चाकणकर यांनी आपल्या जबाबदारीचे योग्य पालन केले नाही. यामुळे राज्य महिला आयोगाच्या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा कमी झाली,” असा आरोपही रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले असून, संबंधित आरोपांवर पुढे कोणती भूमिका मांडली जाते आणि कायदेशीर प्रक्रियेतून कोणते तथ्य समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.