रत्नागिरीतून मोठी बातमी समोर आली आहे. खेड मधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे तिघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले तरूण हे सांगली जिल्ह्यातील असून ते मुंबईत वास्तव्यास होते. ते रत्नागिरीत नातेवाईकांकडे आले होते. मात्र सुट्टीची मजा घेत असतानाच या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंतया घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा सख्ख्या भावांचा आज दुपारी तीनच्या दरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे खेड शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे सख्खे भाऊ मूळचे सांगली जिल्ह्यातील असून मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास होते. सुट्टीसाठी ते खेड येथील नातेवाईकांकडे आले होते.
कांबळे कुटुंबावर शोककळाबुधवारी दुपारी ते आणखी एका नातेवाईकासह जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना नदीतील पाण्याची खोली लक्षात न आल्याने चौघेही खोल पाण्यात अडकले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. या प्रयत्नात एका युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र आकाश, नरेश आणि कैलास कांबळे यांना वाचवता आले नाही. या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या तिघा भावांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नंदुरबारमध्ये 3 मुलांचा बुडून मृत्यूनंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम जामठी परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नदीकाठावरील पाण्याने भरलेल्या डबक्यात बुडून तीन निष्पाप आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या या बालकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली, मात्र तिन्ही बालकांना वाचविण्यात अपयश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे मृत बालकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण आदिवासी समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे.