शरद पवार, अजितदादा मला चावत नव्हते, गणेश नाईक यांच्यामुळेच…मंदा म्हात्रे यांच्या नव्या आरोपांनी एकच खळबळ!
Tv9 Marathi June 16, 2026 07:45 PM

Manda Mhatre Vs Ganesh Naik : नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका कार्यक्रम पत्रिकेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने 15 जून रोजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ निर्माण केला. याच कार्यक्रम पत्रिकेवरून भाजपाच्या आमदार मंत्रा म्हात्रे यांनीदेखील भाजपाचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गणेश नाईक यांच्या नगरसेवकांनी मला कार्यक्रमस्थळी धक्काबुक्की केली, असा आरोपही त्यांनी केला. गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना नवी मुंबईतील एका आरोग्य विषयक सुविधेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आल्याने हा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता मंत्री म्हात्रे यांनी पुन्हा एकदा समोर येऊन नाईक यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

मला त्रास देण्याचा प्रयत्न…

मंदा म्हात्रे यांनी आज (16 जून) माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना, मी कलेक्टर साहेबांना विचारलं की तुम्ही फंड कसा मंजूर केला. कलेक्टर साहेब म्हणाले की मी असं काहीच केलं नाही. मला वाटतं की ती निमंत्रणपत्रिका जाणूनबुजून तयार करण्यात आली असावी. मला त्रास देण्याचा प्रयत्न असेल. मी काल कार्यक्रमाला गेले होते. पण तिथे त्यांचे सगळे नगरसेवक होते. त्यांच्या नगरसेवकांनी मला धक्काबुक्की केली, असा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला.

मी राष्ट्रवादी पक्षात 17 वर्षे काम केले

तसेच, मी राष्ट्रवादी पक्ष का सोडला. पण मी तो पक्ष का सोडला. मला काही शरद पवार किंवा अजितदादा चावत नव्हते. माझं सगळ्यांसोबत चांगलं होतं. मी राष्ट्रवादी पक्षात 17 वर्षे काम केले. मी राष्ट्रवादीची पहिली महिला आघाडीची अध्यक्षा होते. जेव्हा गणेश नाईक हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले होते त्यानंतरच मला राष्ट्रावदी सोडावी लागली. माझ्यावर अन्याय केला जात होता, असाही खळबळजनक आरोप त्यांनी केला.

साहेबांना सगळं माहिती आहे

तुम्ही एवढा अन्याय सहन करण्यापेक्षा थेट आमच्याकडे या, असे मला देवाभाऊ म्हणाले होते. मी भाजपात आल्यानंतर गणेश नाईक हे परत भाजपात आले. आता तीच परिकथा चालू आहे. मला त्रास दिला जातो. कार्यक्रमात धक्काबुक्की करणे हे चालूच असते. साहेबांना सगळं माहिती आहे, असे म्हणत त्यांनी साहेब मला योग्य तो न्याय देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तुम्ही कुठून कुठून जुगाड केले म्हणून….

गणेश नाईक हे भाजपात आले नसते तर ते आमदार आणि मंत्री झाले असते का. ते म्हणतात की मी कोणाकडे भीक मागत नाही. आहो तुम्ही कुठून कुठून जुगाड केले म्हणून तुम्ही मंत्री झाले. मी त्यांच्या अगोदर भाजपात आलेले आहे. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यांचे लोक प्लॅनिंग करून येतात, असाही आरोप त्यांनी केला. आता मंदा म्हात्रे यांच्या आरोपांवर नाईक नेमकं काय बोलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.