आईबाबा आणि मुलांच्या शपथ फेल, ठाकरेंचा 6 आमदार शिंदे गटात? बंडाचं कारण आलं समोर
Tv9 Marathi June 17, 2026 12:45 PM

राज्याच्या राजकारणात भूकंप आला. ऑपरेशन टायगरला सुरूवात झाली. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. ठाकरेचे 6 खासदार वेगळा गट निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. तशा घडामोडीही सुरू आहेत. विशेष विमानांनी हे खासदार दिल्लीत दाखल झाले. ठाकरे यांचे खासदार लवकरच बंड करणार असल्याचे दिसतंय. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडून मध्यरात्री राजस्थानकडे रवाना झाले. आज ते पुन्हा एकदा ठाकरेंच्या खासदारांची बैठक घेणार आहेत. 19 तारखेला ठाकरेंचे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कालच बोलताना संजय राऊत यांनी म्हटले होते की, आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत. त्यांनी आई भवानी, त्यांच्या मुलांची आणि आई वडिलांची शपथ घेत सांगितले की, ते कुठेही जाणार नाहीत.

शिवसेनेचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत, हे स्पष्टच आहे. आज ते ओम बिर्ला यांना बाबतचे पत्रही देतील. शिवसेनेचे इशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे काल दुपारीच दिल्लीत गेल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. ठाकरे गटातील हे सर्व 6 खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळतंय. सुरक्षेमध्ये यांना ठेवण्यात आले.

कामं होत नाही, निधी मिळत नाही , पक्षाकडून हवा तसा पाठिंबा मिळत नाही अशा काही कारणांमुळे हे खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. हे ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची शक्यता आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा दणका आहे. परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांचाही या 6 जणांमध्ये समावेश आहे.

बंडू जाधव गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाचे काम करतात. आमदार, खासदार असा त्यांचा प्रवास आहे. मात्र, पक्षाकडून हवा तसा पाठिंबा मिळत नाही, निधी मिळत नाही, याकरिता ते पक्ष सोडत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून बंडू जाधव नाराज असल्याचीही चर्चा होती. मातोश्रीवर झालेल्या बैठकीतही ते उपस्थित नव्हते. ऑनलाईन पद्धतीने त्यांनी बैठकीला हजेरी लावल्याची सांगण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.