मागच्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा होती. हे ऑपरेशन टायगर खरचं होणार की नुसती हूल दिली जातेय या बद्दल ठाम अंदाज बांधता येत नव्हता. कारण लोकसभेत भाजपकडे स्वत:च्या बळावर 272 हा बहुमताचा आकडा नसला, तरी एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला कुठलाही धोका नाहीय. त्यामुळे ऑपरेशन टायगर होणारच या बद्दल ठाम खात्री नव्हती. पण आता वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडतायत. ऑपरेशन टायगर सक्रीय झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार आहेत. केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार आहेत.
या ऑपरेशन टायगरमुळेशरद पवार गटाची अस्वस्थतता वाढली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अलर्ट मोडवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून संपर्क साधला जात आहे. पुढील एक-दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक होईल अशी सूत्रांची माहिती आहे. कारण सध्याच्या राजकीय स्थितीत कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाचे आठ खासदार निवडून आले होते. सुनेत्रा पवार गटाला फक्त एक रायगडची जागा जिंकता आली होती. पण त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाचे निराशाजनक प्रदर्शन केलं. त्यांचे फक्त 10 आमदार निवडून आले. तेच सुनेत्रा पवार गटाचे 42 आमदार निवडून आले.
म्हणून त्यांनी लगेच पाऊल उचललय
उद्धव ठाकरे यांना त्यांचे 9 खासदार एकत्र ठेवता आले नाहीत. आता तीच धास्ती शरद पवार गटाने घेतली आहे. म्हणून शरद पवार गटाकडून तातडीने खासदारांशी संपर्क साधला जात आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यांची बैठक घेऊन त्यांच्या तक्रारी, मुद्दे ऐकले जातील. ठाकरे गटाचे जे सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत, त्यांचं हेच म्हणणं होतं की, उद्धव ठाकरेंची भेट मिळत नाही, त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. आता शरद पवार यांना आपल्या पक्षात तसं घडू द्यायचं नाहीय. म्हणून त्यांनी लगेच पाऊल उचललय.