Uddhav Thackeray : वडिलांच्या हत्येनंतर राजकारणात शिवसेनेने हात दिला, तो निष्ठावंत खासदारही आज उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?
Tv9 Marathi June 17, 2026 01:45 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. चार वर्षात दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडणार आहे. याआधी 2022 साली शिवसेनेत उभी फूट पडली. आज अधिकृत शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे, तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं. उद्धव ठाकरे गटाचे जे सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत, त्यात ओमराजे निंबाळकर यांचं नाव घेतलं जात आहेत. धाराशिव जिल्ह्यातून येणारे ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत खासदार म्हणून ओळखले जातात. पण ते सुद्धा आता ठाकरेंपासून लांब जाणार असं बोललं जातय. ओमराजे निंबाळकर हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले खासदार आहेत.

ठाकरेंचे सहा खासदार शिवसेनेमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत. ठाकरे शिवसेनेच्या सहा खासदारांपैकी काही खासदार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे त्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे खासदार ओमराजे निंबाळकर हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क केला असता ते पुण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश करावा लागला

जर खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतील तर तो उद्धव ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. ओमराजे निंबाळकर यांना राजकारणात शिवसेनेने उभं केलं. तरुणपणी ओमराजे निंबाळकर यांना राजकारणात अजिबात रस नव्हता. पण 2006 साली वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर यांना वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश करावा लागला. शांत, संयमी स्वभावाचे राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. लोकांसाठी धावून जाणं हा त्यांचा स्वभाव आहे. मराठवाड्यात मागच्यावर्षी पावसाने थैमान घातलं होतं. त्यावेळी ते स्वत: लोकांच्या मदतीसाठी उतरले होते. तळागाळातील जनतेसोबत त्यांचा दांडगा जनसंर्पक आहे.

…म्हणून काँग्रेस सोडली

ओमराजे निंबाळकर यांनी आधी जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत चुणूक दाखवली. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ओमराजेंनी जिल्हा परिषेदत सत्तापालट केला. त्यानंतर 2009 साली त्यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक जिंकली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमुळे 2009 साली धाराशिव विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला व विधानसभेची निवडणूक जिंकली.

विक्रमी मताधिक्क्याने निवडणूक जिंकली

2009 मध्ये आघाडी सरकार असल्याने उस्मानाबाद विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2014 च्या विधानसभेला ओमराजे यांचा पराभव झाला. पुढे 2019 आणि 2024 साली ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधून विक्रमी मताधिक्क्याने निवडणूक जिंकली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.