आता थेट राष्ट्रीय पक्षाला खिंडार? थेट 25 खासदार फुटणार, देशभरात खळबळ; ममतादीदी, उद्धव ठाकरेनंतर कुणाचा नंबर?
Tv9 Marathi June 17, 2026 10:45 PM

देशाच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या 20 खासदारांनी NCPI या पक्षात सामील होत NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून 6 खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता आणखी एका राष्ट्रीय पक्षाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. या पक्षाचे 25-26 खासदार फुटण्याची शक्यता भाजपच्या एक बड्या नेत्याने वर्तवली आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेत झालेल्या फुटीचे उदाहरण देत भाजप नेत्यांकडून उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातही मोठी फूट पडणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी कानपूर येथे माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. समाजवादी पक्षाचे (सपा) 25 ते 26 खासदार सध्या पक्ष सोडण्यासाठी आणि पक्षात फूट पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत असं मौर्य यांनी म्हटलं आहे. भाजप सध्या समाजवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र, 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपर्यंत हे नेते आपोआप पक्ष सोडून जातील, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री राजभर यांनीही दिले संकेत…

याआधी उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राजभर यांनी पोस्टमध्ये लिहिले की, समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार असून रामगोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिले आहे. खनन घोटाळा आणि गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, या घोटाळ्यांचा सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण उत्तर प्रदेशला माहिती आहे. तपासाची कडक कारवाई सुरू झाल्याने समाजवादी पक्ष अस्वस्थ झाला असून पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत, असा दावा त्यांनी केला.

समाजवादी पार्टीने काय म्हटले?

पक्ष फुटण्याच्या दाव्यावर समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि सपाचे आमदार माता प्रसाद पांडे यांनी म्हटले की, ‘ओम प्रकाश राजभर हे स्वतःच एक घोटाळा आहेत.’ पांडे यांनी राज्यात हुकूमशाहीचे वातावरण असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री आणि सरकारच्या भाषाशैलीवरही टीका केली. तर सपाचे नेते रविदास मेहरोत्रा यांनी राजभर यांना दुतोंडी असं म्हटलं आहे. ते केवळ मंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी अशी विधाने करतात. समाजवादी पक्षाचा एकही नेता भाजपमध्ये जाणार नाही आणि 2027 मध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सपाचे सरकार स्थापन होईल असंही मेहरोत्रा यांनी म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.