Vaibhav Suryavanshi Parents with him on England Tour: श्रीलंकेत वैभव सूर्यवंशी समोरच्या संघाला भिडला. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड अलर्ट झाले. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या भूमिकेने बोर्डाला एक धडा मिळाला. आता इंग्लंड आणि आर्यलंड संघाच्या दौऱ्यादरम्यान वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही त्याच्यासोबत असतील. त्याची पहिल्यांदा भारतीय T20 टीमसाठी निवड झाली आहे. 26 जून रोजी बेलफास्टमध्ये सामने सुरू होतील. वैभव एकूण 7 सामन्यात खेळेल. त्यातील दोन आयर्लंडविरोधात तर पाच हे इंग्लंड संघाविरोधात असतील. सर्वच देशांच्या संघात 14 वा 15 वर्षांचा खेळाडू नसतो. अनेक दशकानंतर वैभव सूर्यवंशीसारखा खेळाडू कमी वयात मैदानावर आला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर यांनी 16 व्या वर्षी पदार्पण केले होते. जेव्हा किशोरवयीन मुलगा ज्येष्ठ संघात खेळतो तेव्हा काही अडचणी येतात असे BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली.
वैभवचे आई-वडीलही असतील सोबत
देवजीत सैकिया यांनी सांगितले की, वैभवला अधिक मोकळं वाटावं आणि त्याच्या मनावरील भार हलका करण्यासाठी, दडपण कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. त्याचे आई-वडील सोबत असल्याने वैभवला येणारी अडचण दूर होईल असे व्यवस्थापनाला वाटते. जेव्हा एखादा मुलगा शाळेच्या सहलीवर जातो. तेव्हा त्याच्यासोबत शिक्षक अथवा त्याच्या आई-वडीलांनाही सोबत नेले जाते. वैभवसोबत त्याचे पालक असतील.
वैभव हा अजून लहान आहे. तो बहुधा शाळेच्या अखेरच्या वर्षात असेल. त्यामुळे व्यवस्थापनाला वाटते की, या दौऱ्यावेळी त्याचे आई-वडीलही सोबत असावेत. त्याचे पालक वैभवची काळजी घेतील. कारण वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटसाठी पुढील दोन ते तीन दशकांसाठी एक संपत्ती आहे, असे बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले.
वैभव सूर्यवंशीविरोधात नाही कारवाई
वैभव सूर्यवंशीविरोधात बीसीसीआय कोणताही कारवाई करणार नाही. वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका ए टीमचा खेळाडू विशेन हलंबगे यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. श्रीलंकन खेळाडूंनी चिथावणीखोर टिप्पणी केल्याने सूर्यवंशीने हलंबगे याला धक्का दिला होता. त्यानंतर बीसीसीआय वैभव सूर्यवंशीविरोधात मोठी कारवाई करेल असे सोशल मीडियावर वारंवार दावे करण्यात येत होते. पण देवजीत सैकिया यांनी कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. ही घटना मैदानावर घडली आहे. मॅच रेफरी आणि अम्पायर या निर्णायक व्यक्ती तिथे उपस्थित असताना बीसीसीआय या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही असे सैकिया यांनी स्पष्ट केले. जे काही झाले ते खेळाचाच एक भाग होता. BCCI ची त्यात काहीच भूमिका नाही. जर काही चुकीचं झालं असेल तर अम्पायर आणि रेफरी त्यावर निर्णय घेतील, असे सैकिया यांनी स्पष्ट केले.