टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
जयदीप मेढे June 18, 2026 09:13 PM

Vaibhav Sooryavanshi: बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सामनाधिकाऱ्याला आहे. बीसीसीआय यात हस्तक्षेप करणार नाही. सैकिया म्हणाले की, अशा घटना खेळात घडतात. यासाठी आधीच एक यंत्रणा अस्तित्वात आहे. त्याच यंत्रणेचे पालन केले जाईल. यात आमची कोणतीही भूमिका नाही." 15 जून रोजी दांबुला येथे झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यात श्रीलंका 'अ' संघाने भारत 'अ' संघाला पराभूत केले. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरनंतर, वैभवचा श्रीलंकेच्या खेळाडूंशी वाद झाला आणि त्याने श्रीलंकेच्या विशन हलंबगेला ढकलले.

पंचानी दंडाची शिफारस केली

सामनाधिकाऱ्यांनी या झटापटीबद्दल वैभव आणि हलंबगे या दोघांवर प्रत्येकी 50 टक्के दंडाची शिफारस केली. वैभवला स्लेजिंग केल्याबद्दल श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेलावर 20 टक्के दंडाची शिफारस करण्यात आली आहे, आणि पंचांशी वाद घातल्याबद्दल भारतीय कर्णधार तिलक वर्मावर 30 टक्के दंडाची शिफारस करण्यात आली आहे. दंडांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा आंतरराष्ट्रीय सामना नव्हता. त्यामुळे, सामनाधिकाऱ्याचा निर्णय थेट लागू केला जाऊ शकत नाही. पंच कारवाईची शिफारस करू शकतात. पंचांच्या शिफारशीची अंमलबजावणी करायची की नाही, याचा निर्णय दोन्ही संघांच्या मंडळांवर अवलंबून आहे. आता बीसीसीआयने या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवल्यामुळे, दंड आकारला जाईल की नाही हे ठरवणे श्रीलंकेच्या मंडळावर अवलंबून आहे. जर श्रीलंकेच्या मंडळाने बीसीसीआयची भूमिका स्वीकारली की पंचांचा निर्णय अंतिम असेल, तर वैभव आणि इतर खेळाडूंना दंड आकारला जाईल.

मंडळ पंचांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही

साकिया म्हणाले की, सोशल मीडियावर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. हे बरोबर नाही. सामनाधिकाऱ्याच्या अधिकारक्षेत्रात बीसीसीआयने हस्तक्षेप करावा असे तुम्हाला वाटते का? ज्या क्षेत्रात सामनाधिकाऱ्याची आणि पंचांची निर्णय घेण्यासाठी नियुक्ती केली जाते, त्या क्षेत्रात हस्तक्षेप करणारी बीसीसीआय ही संस्था नाही. मैदानावर जे काही घडले त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे.

श्रीलंकेचा खेळाडू वैभवला काय म्हणाला?

विशन हलंबगेने वैभवबद्दल एक टिप्पणी केली. हलंबगे वैभवला म्हणाला, "हा आयपीएल नाही, सामना संपला आहे... आता तू घरी जा." या टिप्पणीला प्रत्युत्तर म्हणून सूर्यवंशीने श्रीलंकेच्या खेळाडूला ढकलले. त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आले आणि परिस्थिती चिघळली. मात्र, मैदानावर उपस्थित असलेल्या दोन्ही संघांतील उर्वरित खेळाडूंनी हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच काही श्रीलंकेचे खेळाडू सूर्यवंशीला सतत स्लेजिंग करत होते.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.