Maharashtra News Live Update : परभणीत मंदिराचा सभामंडप कोसळला; ३० ते ४० जण अडकले
Sarkarnama June 20, 2026 07:45 PM
परभणीत मंदिराचा सभामंडप कोसळला; ३० ते ४० जण अडकले

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मंदिरातील सभा मंडप कोसळला आहे. त्या सभामंडपाच्या खाली ३० ते ४० भाविक अडकल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने सभा मंडपाच्या खालून काढण्याचे काम सुरू आहे.

तर वर्षभरात काही तरी गोंधळ होणार : राज ठाकरे

ठाकरेसेनेच्या खासदारांच्या फुटीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शाहांवर निशाणा साधला आहे... 2029 च्या तयारीसाठी शाहांकडून खासदारांची फोडाफोडी सुरू असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय... तर वर्षभरात काही तरी गोंधळ होणार.. असंही त्यांनी म्हटलंय

पवनराजे निंबाळकर निकाल ऐकुन हताश 

पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोप निर्दोष सुटले आहेत. आज न्यायालयाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर निराश झाले. यापेक्षा दुर्दैव ते काय. मला वाटतं न्यायव्यवस्थेचं यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. 20 वर्षांचा मोठा कालावधी या खटल्याच्या निकालासाठी घेतला गेला, त्यानंतर असा निर्णय येत असेल तर हे दुर्दैवी आहे.

कोर्टाने राजकीय वैमनस्य होतं, हे मान्य केले आहे, तरीही सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे, कोर्टाच्या निकालाचे पूर्ण वाचन करुन आणि सीबीआय काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

शिंदेसेनेत जाण्याबाबत अद्यापही माझा निर्णय झालेला नाही : ओमराजे

ओमराजे निंबाळकर समर्थकांकडून पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून माफीचा साक्षीदार विश्वसनीय नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत पुन्हा चर्चांना उधाण आलं असून शिंदेसेना प्रवेशाबाबत निर्णय अजून झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ‘ऑपरेशन टायगर’वर परिणाम होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर धाराशीव बंदची हाक

पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आला असून पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालानंतर आता धाराशीव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळं शहरात सर्वत्र दुकानं बंद करण्यात येत आहेत.

पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल वाचायला कोर्टात सुरुवात

पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल वाचायला कोर्टात सुरुवात झाली आहे. यावेळी कोर्टानं सुरुवातीला काही महत्वाच्या नोंदी नोंदवल्या. यामध्ये एक आरोपी हा माफीचा साक्षीदार झाला त्याच्यावर या खटल्याची भिस्त होती. पण या माफीच्या साक्षादारानं नोंदवलेला सुरुवातीचा जबाब आणि आत्ताचा जबाब यामध्ये तफावत असल्याचं मत कोर्टानं नोंदवलं आहे. त्यामुळं या खटल्याचा पायाच कमजोर असल्याचं म्हटलं आहे.

ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर; ठाकरे गटातील बंडखोर खासदार एकाच फ्रेममध्ये

ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदारांचा पहिला फोटो समोर आला आहे. या छायाचित्रात खासदार संजय जाधव, संजय देशमुख आणि संजय दिना पाटील एकत्र दिसत आहेत. ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा आहे. हे सर्व खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सिंधुदुर्गात अवैध मद्यविक्रीवर धडक कारवाई; 8 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गच्या बांदा-दाणोली रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत गोव्यातून आणलेला बेकायदेशीर विदेशी मद्यसाठा आणि वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 8.05 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी नाशिक येथील दोन संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

"पक्षातून नेते का निघून जात आहेत? आत्मपरीक्षण करा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शेतीमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आमदार-खासदारांचा हमीभाव ठरल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ठाकरेंनी इतरांवर आरोप करण्याऐवजी पक्षातून अनेक नेते आणि कार्यकर्ते का बाहेर पडत आहेत, याचा गंभीरपणे विचार करावा, असा सल्ला दिला. तसेच जनतेसमोर वास्तव मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.

पावसाअभावी पेरण्या मंदावल्या; शेतकऱ्यांना घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

अमरावती जिल्ह्यात मान्सूनच्या कमी पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. आतापर्यंत फक्त 1800 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य आहे. पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 24 ते 25 जूननंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नाशिककरांना पाणीटंचाईचा फटका; आज पाणीपुरवठा बंद, उद्या कमी दाबाने पाणी

मान्सूनला उशीर झाल्याने नाशिक शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतील जलसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेने आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या कमी दाबाने पाणी दिले जाणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून, विहिरी कोरड्या पडल्याने खासगी टँकरची मागणीही वाढली आहे.

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल; 20 वर्षांनंतर न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 

राज्यात खळबळ उडवणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज मुंबईतील न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन दशकांपासून सुरू असलेल्या या खटल्यात माजी गृहमंत्र्यांसह 9 आरोपींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी ते कोल्हापूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस महानिरीक्षक यांनी त्यांचे स्वागत केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.