भारताने अफगाणिस्तानला तिसऱ्या वनडे सामन्यात 9 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 1 गडी गमवून पूर्ण केलं. 22.4 षटकात हे आव्हान पूर्ण करत अफगाणिस्तानला लोळवलं. या विजयासह भारताने अफगाणिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 ने मात देत व्हाईट वॉश दिला. कसोटी सामन्यानंतर भारताने वनडे मालिकेत अफगाणिस्तानला मात दिली आहे. विजयी धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक पण सावध सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 69 चेंडूनत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. त्यामुळे सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकला आणि त्याचा निकालही तसाच लागला. यशस्वी जयस्वालने या सामन्यात 83 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने षटकार मारून शतक पूर्ण केलं. या आधीच्या सामन्यात फक्त 4 धावा करून बाद झाला होता. पण त्याची पूर्ण भरपाई या सामन्यात केली.
भारताकडून गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजी केली. त्याने 8.2 षटकात 23 धावा देत 5 गडी बाद केले. यात 2 षटकं निर्धाव टाकली. तर गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. तसेच दोन विकेट धावचीत स्वरूपात मिळाले. अफगाणिस्ताकडून हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझाई वगळता एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. हशमतुल्लाहने 131 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार मारत 102 धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझाईने 56 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
भारत अफगाणिस्तान पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हा सामना 25 षटकांचा झाला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने 194 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 22.5 षटकात 7 विकेट राखून पूर्ण केलं होतं.. तर दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 402 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 232 धावा करू शकला. हा सामना अफगाणिस्तानने 170 धावांनी जिंकला.