गुन्हेगार कितीही पटाईत असला तरी तो पुरावा मागे सोडतोच, त्यानंतर पोलिसांच्या आणि कायद्याच्या कचाट्यात अडकतो. गुन्हेगाराने मागे पुरावे सोडले नसले तरी असं काही करतो, ज्यामुळे कोणालातरी संशय नक्कीच येतो. अखेर पोलिस देखील आरोपींची एक चूक लक्षात घेतात आणि संपूर्ण प्रकरण मार्गी लावतात… आता देखील असं काही झालं आहे. केतन – सिया, सिया आणि तिचा बॉयफ्रेंय चेतन… हे त्रिकूट सध्या चर्चेत आहे. केतन याला मार्गातून हटवण्यासाठी सिया आणि चेतन यांनी मोठा कट रचला आणि केतन याला जीवे मारलं. पण केतन याच्या बहिणीला आलेल्या एका संशयातून संपूर्ण हत्येचं प्रकरण समोर आलं…
पोलिसांनी सांगितल्यानुसार, सिया आणि चेतन पूर्वीपासूनच एकमेकांच्या संपर्कात होते. जानेवारी आणि जून दरम्यान दोघांमध्ये तब्बल 2 हजार 4 कॉल्स झालेले. याच आधारावर संशयीत कॉलर्सची चौकशी करत पोलिसांनी ठोस पुरावे गोळा केले, जे चेतन याचा देखील हत्याकांड हात असल्याचं दर्शवत होते.
प्रकरणाची माहिती देत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुख्य संशयित सिया गोयल हिने केतनच्या अंत्यसंस्कारांनंतर चार दिवसांनी त्याच्या घरी भेट दिली होती. या भेटीदरम्यान, केतन याच्या बहिणीने तिला (सिया) काही प्रश्न विचारले आणि तिची उत्तरे संशयास्पद वाटली; या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुपचूपपणे तपास सुरू केला.
लोकेशन लपण्यासाठी दुकानात सोडला फोन…
तपासादरम्यान पोलिसांच्या असं निदर्शनास आलं की, घटनेच्या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी चेतन चौधरी याचं इंटरनेट कनेक्शन सकाळी 7 ते सायंकाळी 5:40 या कालावधीत सलग बंद होतं; या गोष्टीने तपास अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लोकेशन ट्रॅकिंग टाळण्याच्या सुनियोजित कटाचा भाग म्हणून चेतन याने आपला फोन मुद्दाम दुकानातच ठेवला होता आणि त्याऐवजी आपल्या एका कर्मचाऱ्याचा फोन सोबत घेऊन तो लोहागडला गेला होता, असे पोलिसांना आढळून आलं.
प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी 18 जून रोजी चेतन याला फोन करणाऱ्या सर्वांची चौकशी केली, पण त्या दिवशी चेतन याने कोणाचेच फोन कॉल उचलले नाहीत. तर त्याच्या वतीने दुकानातील कर्मचाऱ्यांनीच फोनला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर, इंटरनेट सेवा बंद असणं आणि इतर संशयास्पद बाबींबाबत पोलिसांनी चेतनची सखोल चौकशी केली असता, तपासादरम्यान त्याला गुन्ह्याशी थेट जोडणारे अनेक पुरावे हाती लागल्याचे समजते. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.