पुण्यातील केतन अग्रवाल या तरुणाच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण देशात चर्चेत आहे. त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडावरून खाली ढकलून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अशातच आता या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या दोघांनी पूर्व नियोजित कट रचून ही हत्या केल्याचेही आता समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता चेतन चौधरीच्या काकांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
चेतनचे काका उदाराम चौधरी यांनी म्हटले की, चेतनचा या प्रकरणात सहभाग नाही. तो पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याला एका खोट्या प्रकरणात गोवण्यात येत आहे. दुकानात वारंवार फोन येत असल्याने त्याने आपला मोबाईल फोन सोबत घेतला होता. नीरजसुद्धा त्याच्यासोबत होता. चैतन्यने काय केले किंवा का केले, याबद्दल सध्या आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.
पुढे बोलताना उदाराम चौधरी यांनी सांगितले की, ‘चेतन असे कृत्य कधीही करणार नाही. तो कधीही कोणाचा खून करू शकत नाही. तो खेळामध्ये आवड असलेला एक साधा मुलगा आहे. तो अशा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात कधीही सामील होणार नाही. आम्ही सियाला ओळखत नाही. आम्हाला सियाची ओळख आणि तिच्या हालचालींबद्दल फक्त मीडिया आणि बातम्यांमधूनच कळले.
उदाराम चौधरी यांनी पुढे बोलताना सांगितले की, आम्ही सध्या कायदेशीर सल्ला घेत आहोत आणि आमच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करू.आमचा कोणाशीही वाद किंवा संघर्ष नाही. संपूर्ण बाजारपेठेत आमचे कोणाशीही वैर नाही. आम्ही गोयल कुटुंबाला ओळखत नाही, किंवा त्यांच्याशी आमचे कोणतेही संबंध नव्हते. गेल्या वर्षभरात चेतनने काय केले आहे किंवा तो कोणाच्या संपर्कात होता, याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलीस सध्या कंपनीचे कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावत असून, तपास सुरू आहे.