हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतली आहे. टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 23 व्या सामन्यात बांगलादेशवर मात करत 2 गुणांची कमाई केली आहे. बांगलादेशने टीम इंडियासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान ओपनर शफाली वर्मा हीच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज आणि सुरक्षितपणे पूर्ण केलं. शफालीला तिच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं. भारताचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीतील आपला दावा आणखी मजबूत केला आहे. टीम इंडियाने 137 धावांचं आव्हान हे 5 विकेट्स राखून 19 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 16.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 139 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम राखलं आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशसाठी कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आलं नाही. बांगलादेशसाठी जुवैरिया फिरदौस हीने सर्वाधिक 33 धावा केल्या. निगर सुल्ताना हीने 32 धावांचं योगदान दिलं. तर सोभना मोस्त्री हीने 22 रन्स केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियासाठी राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्यात. श्री चरणी हीने दोघींना बाद केलं. तर नंदीनी शर्मा आणि रेणुका सिंह ठाकुर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडियाला हा सामना आणखी लवकर संपवता आला असता. मात्र बांगलादेशने भारताला 5 झटके दिल्याने सामना लांबला. स्मृती मंधाना हीने निराशा केली. स्मृतीने 8 धावा केल्या. भारतासाठी शफाली वर्मा हीने सर्वाधिक 53 धावांचं योगदान दिलं. शफालीने या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. यास्तिका भाटीया हीने 23 रन्स केल्या. ऋचा घोष 10 धावा करुन माघारी परतली. जेमिमाह रॉड्रिग्स हीने 26 रन्स केल्या. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी भारताला नाबाद राहून विजयापर्यंत पोहचवलं. हरमनप्रीतने 13 आणि दीप्तीने 5 धावा केल्या. बांगलादेशसाठी रितू मोनी हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.